तुळजापूर दूषित पाणी आणि अस्वच्छतेविरोधात तुळजापूरकरांचा एल्गार; विरोधीपक्षीय नगरसेवक व नागरिकांचे लाक्षणिक उपोषण!
तुळजापूर (प्रतिनिधी):-
तुळजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून भेडसावत असलेल्या अस्वच्छतेच्या समस्या आणि दूषित पाणीपुरवठ्या विरोधात आज तुळजापूर शहरवासीय आणि विरोधी लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहराच्या स्वच्छतेबाबत आणि नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेल्या खेळखंडोब्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज २० मार्च २०२६ रोजी भव्य ‘लाक्षणिक उपोषण’ करण्यात आले.
या आंदोलनात तुळजापूर शहरातील सर्व विरोधी नगरसेवक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि जागरूक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील कचरा व्यवस्थापन कोलमडले असून, अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तसेच, नळावाटे येणारे पाणी दूषित असल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले.
आंदोलकांनी प्रशासनासमोर खालील मागण्या मांडल्या आहेत:
स्वच्छता कामात नियमित सुधारणा: शहराच्या स्वच्छतेचे काम केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर दिसावे आणि त्याचे नियमित मॉनिटरिंग व्हावे.
पाणी शुद्धतेचा अहवाल जाहीर करा: दूषित पाणीपुरवठ्याची लॅब तपासणी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा.
दोषी कंत्राटदारांवर कारवाई: स्वच्छतेच्या कामात कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी.
शुद्ध पाणीपुरवठा: प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी मिळावे.
तक्रार निवारण केंद्र: स्वच्छतेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी.
“शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासन ढिम्म आहे. जर या मागण्या त्वरित मान्य झाल्या नाहीत आणि शहराच्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर आगामी काळात तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल,” असा इशारा यावेळी उपस्थित नेत्यांनी आणि नागरिकांनी दिला.
या उपोषणामुळे तुळजापूर नगरपरिषद प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. पण लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्याकडून विविध उपाय योजना!
तुळजापूर तालुक्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा – ‘तुळजाई एक्सप्रेस’ न्यूज पोर्टल!






