*”माझ्या भिमान नं,,माझ्या बापान नं,,, भिमा नं माय,, सोन्यानं भरली ओटी”*
मुरूम येथे भिमगायिका कडूबाई खरात यांच्या कार्यक्रमाला अलोट गर्दी
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि .२९) सायंकाळी डॉ आंबेडकर वाचनालयासमोर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने प्रसिद्ध भिमगायिका कडूबाई खरात यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला भीमसैनिकांनी अलोट गर्दी केली होती.
राजस्थानच्या राज्यपालांचे विशेष कार्याधिकारी राजकुमार सागर व त्यांच्या सुविद्य पत्नी वंदाराणी सागर कुटुंबाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध भिमगायिका कडूबाई खरात यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतांचे दमदार सादरीकरण केल्याने बुधवारची रात्र भीमगीतांनी उजळून निघाली.”माझ्या भिमा नं,, माझ्या भिमा नं,, भिमा नं माय सोन्यानी भरली ओटी” , “अहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला” , “बाबासाहेब आंबेडकर हे नाव गाजतंय हो जगभर” ,”गावा मध्ये गाव आहे ते महू गाव,जिथे जन्मले भीमराव” , “घडणार नाही असं घडून आलं, महिलांचा उद्धार माझ्या भिमानं केलं” ,यांसारख्या भीमगीतांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत आनंद लुटला.यावेळी कडूबाई खरात यांनी “कुणी नाही केलं भलं हो माय, माझ्या भिमानं केलं” हे गीत सादर करत प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला.याबरोबरच “अंधार फार झाला, दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊ चा शिवा पाहिजे,या देशाला रमाई चा भिमा पाहिजे” हे गीत सादर करत शिवराय भीमरायाच्या जीवनावर प्रकाश टाकला. तर “नको खंडूबा ,नको मसुबा” या गीतातून अंधश्रद्धेवर आसूड ओढले.शेवटी “तुम्ही खाता त्या भाकरीवर, बाबासाहेबांची सही हाय रं” हे गीत सादर करत अठरा पगड जातीवर बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराची जाणीव करून दिली.प्रारंभी कडूबाई खरात यांनी गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी नगरसेवक रुपचंद गायकवाड,जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष मदन गायकवाड, उपाध्यक्ष अमोल बनसोडे, कोषाध्यक्ष प्रा अण्णाराव कांबळे, सचिव आनंद गायकवाड आदी उपस्थित होते.कार्यक्रम ऐकण्यासाठी डॉ आंबेडकर वाचनालय ते पोलीस ठाणे समोरील चौका पर्यंत मोठी गर्दी झाली आहे. प्रेक्षकांना कार्यक्रम पाहता यावा यासाठी आयोजकांनी तीन ठिकाणी मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था केली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत गायकवाड,राहुल गायकवाड,प्रबुद्ध गायकवाड, अभिजित कांबळे, प्रशांत मुरूमकर, प्रवीण गायकवाड, प्रा साधू गायकवाड, राहुल गायकवाड,दिनेश भालेराव, अजिंक्य गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.








