*“अण्णाभाऊंची लेखणी विषम व्यवस्थेविरुद्ध परिवर्तनाची मशाल होती” – ॲड. शीतल चव्हाण यांचे प्रतिपादन*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
*माडज येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात*
तालुक्यातील माडज येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीतून शोषित, वंचित व कष्टकरी समाजाच्या वेदनांना वाचा फोडली. त्यांची लेखणी केवळ साहित्यनिर्मिती करणारी नव्हती, तर अन्याय, शोषण आणि विषम व्यवस्थेविरुद्ध लढणारी परिवर्तनाची मशाल होती. अण्णाभाऊंचे विचार आणि साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ॲड. शीतल चव्हाण यांनी केले.
माडज येथे रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सभापती हरीश डावरे व उपसरपंच बलभीम काळे यांच्या हस्ते झाले. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजित गौतम होते. नेताजी गायकवाड यांनी प्रास्ताविक केले, तर राजेंद्र सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ॲड. शीतल चव्हाण, बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष राम गायकवाड आणि हरीश डावरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून सामान्य माणसाचा संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक वास्तव प्रभावीपणे मांडले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये प्रत्यक्ष जीवनात रुजविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे ॲड. चव्हाण यांनी सांगितले.
कार्यक्रमाला पोलीस पाटील मारुती कुंभार, चंद्रकांत काळे, सुरेश काळे, शिवशंकर गौतम, संजय शहापुरे, विजय जगताप यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम समितीचे अध्यक्ष दिनेश सरोदे व सर्व समिती सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.






