ग्रंथ वाचनाने ज्ञान प्राप्ती होऊन माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो : डॉ.सोमनाथ रोडे
—————————————————–
नळदुर्ग (एस.के. गायकवाड) :-
ग्रंथ वाचनाने माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होते ज्ञानप्राप्ती होते आणि माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो तेंव्हा वाचन संस्कृती जपली पाहिजे,वाढवली पाहिजे आणि गावोगावी ग्रंथालय झाले पाहिजेत नव्हे ती एक काळाची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे (लातुर ) यांनी खुदावाडी तालुका तुळजापूर येथे आयोजित धाराशिव जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशनामध्ये बोलताना केले.
तुळजापूर तालुक्यातील शेतकरी वाचनालय खुदावाडी या ग्रंथालयाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने या ग्रंथालयाचा सुवर्ण महोत्सव वर्धापन दिनाचे अवचित साधून धाराशिव जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने दरवर्षी होणारे ग्रंथालयाचे जिल्हा अधिवेशन हे ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा.व.ग.सूर्यवंशी व थोर समाजसेवक डॉ.सिद्रामाप्पा खजुरे यांच्या मार्गदर्शनाखाली खुदावाडी तालुका तुळ्जापूर येथे धाराशिव जिल्हा ग्रंथालय संघ अधिवेशन २o२५-२६ चे आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे हे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा.कमलाकर दादा कबाडे हे होते तर या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक तथा इतिहासाचे अभ्यासक डॉ.सतीश कदम हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमानजी ढाकणे,प्राध्यापक मनोहर कबाडे,सरपंच श्रीमती सरोजिनी रेवणाप्पा कबाडे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना प्राचार्य रोडे म्हणाले की जो समाज वाचन संस्कृती जोपासतो तो समाज प्रगल्भ आणि सुसंस्कृत बनतो तेंव्हा सध्याच्या सोशल मीडियाच्या आव्हाणाला सामोरे जाताना वाचन संस्कृती जोपासव्या करिता गावा गावात ग्रंथालय काढणे गरजेचे असून शासनाने ग्रंथालय निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे व ग्रंथालयांना भरीव असे अनुदान देणे महत्त्वाचे आहे.
तर इतिहासाचे अभ्यासक प्रा.डॉ.सतीश कदम आपल्या भाषणात म्हणाले की ग्रंथालयाचे जनक एस.आर. रंगनाथन हे आहेत त्याना मी सर्व प्रथम आभिवादन करतो परंतु ग्रंथालय चळवळीचा इतिहास हा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरना ग्रंथ वाचनाचा फार मोठा व्यसंग होता.त्यामुळेच त्यांच्या सर्वांग व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन ते आज जागतिक पातळीवर महामानव म्हणून प्रकांड पंडित म्हणून ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जात आहेत.आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी घर बांधतो पण पुस्तकासाठी घर बांधणारा एकमेव महामानव म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आहेत.तेंव्हा वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालय चळवळीला गती देणे ही काळाची गरज आहे.
. या प्रसंगी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथून ग्रंथपाल म्हणून सेवानिवृत्त झालेले व शेतकरी वाचनालय खुदावाडी चे मुख्य संचालक वसंतराव चिंचोले यांचा ग्रंथालय संघाच्या वतीने व शेतकरी वाचनालय खुदावाडीच्या वतीने मानपत्र देवून विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व.ग.सूर्यवंशी यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत डॉ.सिदाम खजूरे यानी केले व सूत्रसंचलन सेवानिवृत्त शिक्षक साहित्यिक कवि मनोहर घोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन तुकाराम बोंगरगे यांनी केले.
या वेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमंतजी ढाकणे व इतर मान्यवरांचेही मार्गदर्शनपर भाषणे झाली.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बापू बांगरगे, अनंत अहंकारी सह जिल्ह्यातील सर्व ग्रंथालय संचालक,कर्मचारी व वाचक महिला ग्रामस्थ युवा कार्यकर्ते साहित्यिक नवोदित साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






