४० अंशांच्या चटक्यातही उसळला भीमसागर; तुळजापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला!
तुळजापूर (प्रतिनिधी): रणरणत्या उन्हाचे चटके, अंगाची लाहीलाही करणारा ४० अंश सेल्सिअसचा पारा आणि घामाच्या धारा… अशा कडाक्याच्या उन्हातही भीमसैनिकांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झाला नाही. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुळजापूर शहरासह परिसरात ‘भीमसागर’ लोटल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायांनी निळ्या निशाणाखाली एकत्र येत जयभीमचा जयघोष केला.
तुळजापूर नगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष पदाधिकारी यांचे सुयोग्य नियोजन आणि भीमसैनिकांचा उत्साह त्यात सूर्याचा कोप, पण श्रद्धेचा विजय सकाळपासूनच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली होती. दुपारच्या सुमारास तापमान ४०°C च्या पुढे गेले असतानाही अबालवृद्धांसह महिला आणि तरुणांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. तुळजापूर शहरातील मुख्य रस्ते निळ्या रंगात न्हाऊन निघाले होते. डोक्यावर ऊन असतानाही हातात निळे ध्वज घेऊन अनुयायी मोठ्या संख्येने अभिवादन स्थळाकडे कूच करत होते.
‘जयभीम’चा नारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. “दिल से बोल जय भीम बोल ,जय भीम” भारतीय राज्यघटनेचा विजय असो’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि सरबताची सोय करण्यात आली होती, भोजन व्यवस्था ही करण्यात आली होती. जेणेकरून उन्हाचा त्रास कोणाला होऊ नये.
प्रमुख वैशिष्ट्ये: रक्तदान शिबिराचे आयोजन करून संविधानाच्या पुस्तकाच्या प्रति देण्यात आल्या.
शिस्तबद्ध नियोजन : कडाक्याचे ऊन असूनही भीमसैनिकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने अभिवादन केले.
तरुणांचा सहभाग: डीजेच्या तालावर न नाचता भीम गीत गायनाचा कार्यक्रम दिवसभर चालू होता. ढोल-ताशांच्या गजराने वातावरणात चैतन्य भरले होते.
महिलांची उपस्थिती घरची कामे आटोपून कडक उन्हातही महिला मोठ्या संख्येने आपल्या लेकराबाळांसह, अबाल वृद्ध , अभिवादन करण्यासाठी आले होते.
”हे ऊन आमच्यासाठी काहीच नाही. ज्यांनी आम्हाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला, त्या महामानवासाठी ४० काय ५० अंशातही आम्ही उभे राहू,” अशी भावना एका भीमसैनिकाने व्यक्त केली.
सायंकाळपर्यंत तुळजापूर शहर ‘भीममय’ झाले असून, ठिकठिकाणी भीमगीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उन्हाची तमा न बाळगता लोटलेला हा जनसागर डॉ. बाबासाहेबांवरील अढळ प्रेमाची साक्ष देत होता.






