एकाच छताखाली महसुली सेवा ; तुळजापूरच्या ‘समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून तुळजापूर तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित महसुली प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुळजापूर तहसील कार्यालयात आयोजित या शिबिरामध्ये विविध महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत प्रशासनाने नागरिकांना मोठा दिलासा दिला. “जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा”
या शिबिरात फेरफार प्रकरणे, अभिलेख दुरुस्ती, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत तात्काळ सेवा, अकृषक तरतुदींबाबत मार्गदर्शन, ई-मोजणी, , पीएम किसान योजना तसेच तक्रार निवारण सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. ‘एक खिडकी व्यवस्था’ अंतर्गत तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी थेट अर्ज स्वीकारून अनेक प्रकरणे जागेवर निकाली काढली.
पुरवठा विभागामार्फत ४० ते ५० नागरिकांना शिधापत्रिका दुरुस्ती व नवीन लाभ देण्यात आला. तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तब्बल ८५ लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला.यावेळी तहसीलदार अरविंद बोळंगे, जिल्हाधिकारी पुरुषोत्तम कोकरे, भूमी अभिलेख विभागाचे सचिन राठोड, पुरवठा अधिकारी सौ.मनीषा कोळगे, नायब तहसीलदार सौ.प्रियंका लोखंडे, मंडळ अधिकारी अमर गांधले, तलाठी अमोल निरफळ सह सर्व तलाठी तसेच नगराध्यक्ष विनोद गंगणे, सज्जन साळुंके, सुनिल घाडगे तसेच गटनेते अमोल कुतवळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.दरम्यान, शासनाच्या ‘Ease of Doing Business’ उपक्रमांतर्गत आयोजित या शिबिरामुळे महसुली प्रशासन अधिक पारदर्शक व गतिमान होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. अशाच कार्यक्रमातून सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यात एक सूत्रता निर्माण होण्यास प्रयत्न होईल आणि जनतेचे प्रश्न कमी खर्चात सुटतील व कामे योग्य वेळेत होतील. या कार्यक्रमाचे जनमानसातुन कौतुक होत आहे.







