अर्धापूरात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सुळसुळाट ;
मान्यता,स्थलांतर व नियम पालनाबाबत चौकशीची मागणी
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
अर्धापूर शहरात गेल्या २ ते ३ दशकांपासून इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढत असून अनेक शाळांच्या मान्यता, स्थलांतर आणि नियम पालनाबाबत फार मोठे भयंकर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.शिक्षण विभागाने या महत्त्वाच्या व मोठ्या समस्या व प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ताबडतोब सर्वंकष चौकशी करावी अशी मागणी अभ्यासू , जागरूक नागरिक व पालकांकडून करण्यात येत आहे.सध्या पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेता शहरात २ ते ४ वर्षात मोठ्या प्रमाणावर नवीन शाळा सुरू झाल्या आहेत.परंतु अनेक शाळा काही वर्षे सुरू राहून नंतर बंद पडल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर त्याचे परिणाम झालेले आहेत.अशा शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या टी.सी.,निर्गम उतारे व इतर शैक्षणिक कागदपत्रांसाठी पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे.तामसा रोड परिसरात यापूर्वीच अवघ्या काही अंतरावर अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा कार्यरत आहेत.अशा परिस्थितीत एकाच परिसरात इतक्या शाळांना मान्यता देताना शासनाच्या नियमांचे पालन झाले आहे का,याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.काही शाळांनी पूर्वी मान्यता नसताना किंवा इतर ठिकाणच्या मान्यतेच्या आधारे शाळा चालवल्याच्या तक्रारी समोर आल्या असून काही संस्थांनी मूळ मान्यता मिळालेल्या ठिकाणाऐवजी अन्यत्र शाळा सुरू केल्याचेही सांगितले जात आहे.त्यामुळे संबंधित शाळांची मूळ मान्यता,दाखविण्यात आलेली जमीन,इमारत,स्थलांतराची परवानगी आणि व्यवस्थापनातील बदल यांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सेल्फ फायनान्स तत्त्वावरील शाळांना ज्या ठिकाणासाठी शासनाने मान्यता दिली आहे त्याच ठिकाणी त्या कार्यरत आहेत का,आवश्यक जमीन,इमारत व इतर भौतिक सुविधा उपलब्ध आहेत का अशा नियमाच्या सर्व बाबींची तपासणी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.कारण हे संस्था चालक फक्त हातमिळवणी करून देवाण घेवाण करतात व अर्थकारण करून शाळांना शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून,शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून वरील समऱ्याग्रस्त शाळांना मान्यता देतात व घेतात आणि अशा शाळांमुळे विद्यार्थ्याचे भविष्य,मान्यता शाळा,पालक, नागरिक,गावं,शहर व तालुका अशा सर्वांना त्रास देवून त्यांचे नुकसान करीत आहेत.त्यामुळे अशा फसव्या शाळांमुळे मान्यताप्राप्त शाळा व त्या शाळेत शिकणारे अभ्यासु,हुशार विद्यार्थी ज्यांचे भविष्य उज्ज्वल आहे अशा सर्वांचे अतोनात नुकसान होत आहे.त्यामुळे अशा प्रकारच्या महत्वाच्या,मोठ्या व गंभीर समस्ये बाबत पंचायत समिती अर्धापूर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग नांदेड,शिक्षण उपसंचालक,शिक्षण संचालक व शिक्षण आयुक्त यांनी संयुक्तपणे चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संस्था व व्यक्तींवर योग्य ती कार्यवाही ताबडतोब करावी अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा या प्रश्नावर पालक,विद्यार्थी व जागरूक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे व होणाऱ्या परिणामास वरील मिलीभगत करणारे जवाबदार राहतील असे कळविण्यात आले आहे.





