दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव; पत्रकार समाजाचा आरसा – सुहास साळुंके
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरातील पत्रकारांचा सन्मान पत्रकार हा समाजाचा आरसा असून त्यांच्या लेखणीमधून समाजाचे खरे प्रतिबिंब उमटते, असे प्रतिपादन माजी नगरसेवक सुहास साळुंके यांनी केले. दर्पण दिनाचे औचित्य साधून महावीर मसाला सेंटरच्या वतीने तसेच महादेव कासार यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप अमृतराव, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, शहराध्यक्ष सचिन ताकमोगे, ज्येष्ठ पत्रकार अंबादास पोपळे, पत्रकार जगदीश कुलकर्णी, संजय कुलकर्णी आणि सिद्धी पटेल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनांवर वस्तुनिष्ठपणे प्रकाश टाकण्याचे महत्त्व पत्रकारितेत फार मोठे असल्याचे साळुंके यांनी नमूद केले. टीआरपी आणि व्ह्यूजच्या स्पर्धेतही सत्य, नीतिमत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे आव्हान पत्रकारांसमोर असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पत्रकार जगदीश कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करत पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून ती समाजासाठीची चळवळ असल्याचे सांगितले. सत्यनिष्ठ पत्रकारितेमुळे लोकशाही अधिक सक्षम होते, असेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास साळुंके , बापू आमृतराव आणि महादेव कासार यांनी केले. दर्पण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे पत्रकारांच्या कार्याची समाजात पुन्हा एकदा दखल घेतली गेली.






