कार्यक्षम प्रशासनाचा आदर्श; राज्यातील सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांमध्ये धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार राज्यात तिसरे
तुळजापूर प्रतिनिधी/सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत.
कार्यालयीन मूल्यमापन अंतर्गत राबविण्यात आलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. ही धाराशिव जिल्ह्याच्या प्रशासनासाठी अभिमानास्पद बाब आहे.
महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्हाधिकाऱ्यांमध्ये धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी उल्लेखनीय कामगिरी करत २०० पैकी १८५.२५ गुण प्राप्त केले आहेत. हे मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी विविध ई-गव्हर्नन्स उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. ऑनलाईन सेवा, तक्रार निवारण यंत्रणा, वेळेत निर्णय प्रक्रिया, कार्यालयीन शिस्त, डिजिटल प्रणालींचा वापर, तसेच नागरिकांना सुलभ सेवा देण्यावर विशेष भर देण्यात आला होता.
जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा प्रशासनाने या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत राज्यपातळीवर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
या यशामुळे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांची राज्यात सकारात्मक ओळख निर्माण झाली असून, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सर्व उपविभागीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांच्या सहकार्याने नागरिकांना अधिक सक्षम, जलद व पारदर्शक सेवा मिळण्यास निश्चितच मदत होणार आहे.






