जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथील बाल चिमुकल्या कलाकाराने गाजविला रंगमंच : पाणीटंचाई,अंधश्रद्धा, शिक्षण व महामानवांच्या विचाराचे मनोरंजनातून केले प्रबोधन
——————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथील शालेय विद्यार्थी अर्थात बालचिमुकल्या कलाकाराने गाजविला रंगमंच मनोरंजनातून केले शिक्षण पाणीटंचाई अंधश्रद्धा व महामानवांच्या विचाराचे प्रबोधन.
दि.२६ जानेवारी २o२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी तालुका तुळजापूर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी विविध गुणदर्शनच्या कार्यक्रमांमध्ये बालचिमुकल्या शालेय विद्यार्थी कलाकारानी विविध कलेचे सादरीकरण करून शिक्षण पाणीटंचाई अंधश्रद्धा व महामानवांच्या विचाराचे मनोरंजनातून प्रबोधन केले.
सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे पालकांचा ओघ वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी संख्या घटत असून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.याविषयी “माझी मराठी शाळा” हे गीत सादर करून विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाच्या शिक्षणाविषयी पालकाना जाणिव करून दिली.
तर दिवसेन दिवस वृक्षतोड,जंगलतोड मोठ्या प्रमाणात करून सिमेंटचे बंगले उभारले जात आहेत त्यामुळे पर्जन्यमान कमी होऊन पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येत आहे.याविषयी संत एकनाथ महाराजांच्या भारुड गीत प्रकारातून शालेय विद्यार्थ्यांनी
“वरूण राजाची माया संपली आकाश कोपलं पाणी हरवल पाणी हरवल ” हे भारुड गीत सादर करून पाणीटंचाई विषयी प्रेक्षकांमध्ये जाणीव जागृती करून दिली. तर “बुरगुंडा होईल तुला” हे भारुड गीत सादर करून बिराजदार या विद्यार्थ्याने उपस्थित सर्व प्रेक्षकांचे मने जिंकली.सर्वांना आपल्या कलेतून मंत्रमुग्ध केले व वन्स मोर चा सन्मान मिळवला.
तसेच “रडू नको बाळा मी पाण्याला जाते” या गीतावर सामूहिक नृत्य सादर करून शालेय विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधले तर लावणी या नृत्य प्रकारातून आरोही अकाडे यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर शालेय विद्यार्थ्यांनी मंचावर अक्षरशा रतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार उभा करून व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतावर उत्कृष्ट नृत्य सादर करून महामानवांच्या विचारांचा जागर केला.
अशा प्रकारे एकाहून एक वरचढ कला सादर करून शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी दडलेल्या सुप्त गुणांनाचे दर्शन घडविले.
. या एकूणच कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करून शाळेचे मुख्याध्यापक बी.बी. सगर यांनी पालकांना ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत खेळवून ठेवले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षिका एस. एस.मसे मॅडम,सहशिक्षक एन.एन काळे, डी. बी. अनपट, तानाजी लोहार सर आदीनी परिश्रम घेतले. यावेळी पालक गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामस्थ महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते








