आज शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तुळजापूर, तसेच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, धाराशिव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), धाराशिव येथील प्राचार्य आणि प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी ( टीपीओ ) यांची भेट घेतली.
भारत सरकारने मराठवाडा रेल कोच फॅक्टरी हा महत्त्वाचा प्रकल्प लातूर येथे सुरू करताना मराठवाड्यात स्थानिक रोजगार निर्माण व्हावा हा उद्देश मांडला होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकल्पातून सुमारे १०,००० रोजगारांच्या संधी निर्माण होतील असे सांगितले आहे.
परंतु प्रत्यक्षात धाराशिव जिल्ह्यातील या शासकीय महाविद्यालयांना अद्यापपर्यंत या प्रकल्पाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच या महाविद्यालयांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट, इंटरव्ह्यू ड्राइव्ह किंवा ट्रेनिंग प्रोग्राम देखील आयोजित करण्यात आलेले नाहीत.
धाराशिव जिल्ह्यातील अनेक तरुण आजही नोकरीच्या शोधात पुणे आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरांकडे जात आहेत. आपल्या अगदी जवळ एवढा मोठा प्रकल्प असताना जर खरोखरच १०,००० रोजगार निर्माण होणार असतील, तर त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील किमान २००० तरुणांना संधी मिळाली पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे.
आज या सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना निवेदन देऊन, मराठवाडा रेल कोच फॅक्टरीच्या एचआर विभागाशी संपर्क साधून कॅम्पस प्लेसमेंट, कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आणि आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
“मराठवाडा” या नावाने उभा राहिलेला हा प्रकल्प असल्यामुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील युवकांना न्याय्य संधी मिळाली पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न पुढेही सुरू राहील.
– जगदीश पाटील , धाराशिव
– जिल्हा प्रवक्ता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे







