Best News Portal Development Company In India

बुद्ध, कामगार आणि महाराष्ट्र : नव्या मुक्तीच्या दिशेने एक संकल्प !

*बुद्ध, कामगार आणि महाराष्ट्र : नव्या मुक्तीच्या दिशेने एक संकल्प*

उमरगा/लोहारा प्रतिनिधीआदिनाथ भालेराव.
आजचा दिवस विलक्षण आहे. बौद्ध पौर्णिमा, कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन हे तीन दिवस( दि. १ )रोजी आज एकाच क्षणी, एकाच आकाशाखाली, एकाच सामाजिक जाणिवेत एकत्र आले आहेत. हा केवळ दिनदर्शिकेचा योगायोग नाही; हा इतिहासाने वर्तमानाला दिलेला गंभीर इशारा आहे. हा दिवस आपल्याला सांगतो की माणसाच्या मुक्तीचा प्रश्न फक्त आत्म्याचा नाही, फक्त पोटाचा नाही आणि फक्त प्रदेशाचा नाही. तो एकाच वेळी मनाचा, श्रमाचा, समाजाचा, राज्याचा आणि संस्कृतीचा प्रश्न आहे.

बुद्ध पौर्णिमा आपल्याला विचारते आहे की माणसाच्या मनात करुणा आहे का? कामगार दिन विचारतो आहे की माणसाच्या श्रमाला न्याय आहे का? आणि महाराष्ट्र दिन विचारतो आहे की या भूमीने ज्यासाठी १०६ हुतात्म्यांचे रक्त घेतले, त्या महाराष्ट्राने आज आपली पुरोगामी प्रतिज्ञा जपली आहे का?

या तिन्ही प्रश्नांची उत्तरे शोधणे आज अत्यंत आवश्यक झाले आहे. कारण जग पुन्हा एका भीषण वळणावर उभे आहे. एका बाजूला विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अवकाश संशोधन, औद्योगिक प्रगती यांचे वैभव आहे; तर दुसऱ्या बाजूला युद्धखोरी, अण्वस्त्रांची स्पर्धा, बाजाराची निर्दयी नफेखोरी, पर्यावरणाचा विनाश, कामगारांचे बदलते शोषण, धार्मिक उन्माद, जातीय विद्वेष आणि राजकीय नैतिकतेचा घसरत चाललेला कडा आहे.

माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले, मंगळावर यान पाठवले, महासंगणक उभे केले; पण माणसाच्या मनातला हिंस्र पशू अजून पूर्ण मेला नाही. माणसाने बाजार मोठा केला, पण मन लहान केले. उत्पादन वाढवले, पण समता वाढवली नाही. तंत्रज्ञान निर्माण केले, पण न्यायाची रचना निर्माण केली नाही. म्हणूनच आज बुद्धाची करुणा आणि मार्क्सचा वर्गन्याय हे दोन विचार पुन्हा नव्याने एकत्र वाचण्याची, समजण्याची आणि समाजजीवनात उतरवण्याची गरज आहे.

बुद्धाने माणसाच्या दु:खाचे मूळ शोधले. तृष्णा, लोभ, अहंकार, हिंसा आणि अज्ञान यामुळे माणूस दु:खी होतो, असे बुद्ध म्हणाले. मार्क्सनेही माणसाच्या दु:खाचा शोध घेतला; पण तो शोध त्याने उत्पादनसंबंधात, मालकीच्या रचनेत, भांडवलशाहीच्या पिळवणुकीत घेतला. बुद्ध माणसाच्या अंतःकरणात उतरले; मार्क्स समाजाच्या पोटात उतरला. बुद्धाने मनातील लोभाला प्रश्न विचारला; मार्क्सने व्यवस्थेतील लोभाला प्रश्न विचारला. बुद्धाने करुणेचा मार्ग दिला; मार्क्सने शोषणमुक्तीचा मार्ग दिला. म्हणून हे दोन विचार परस्परविरोधी नसून परस्परपूरक आहेत.

फक्त मन बदलले आणि व्यवस्था तशीच राहिली, तर बदललेला माणूस अन्यायी व्यवस्थेत चिरडला जातो. आणि फक्त व्यवस्था बदलली पण माणसाच्या मनातील लोभ, सत्ता, हिंसा, अहंकार बदलले नाहीत, तर नव्या व्यवस्थेत जुनेच अत्याचार नवी नावे घेऊन उभे राहतात. म्हणून बुद्ध आणि मार्क्स यांचा समन्वय म्हणजे आतल्या माणसाचा आणि बाहेरच्या समाजाचा एकत्र बदल. करुणा आणि क्रांती, प्रज्ञा आणि प्रतिकार, शील आणि संघटन, अहिंसा आणि न्याय यांची सांगड घालणे हाच आजचा खरा मार्ग आहे.

आजचा कामगार १९ व्या शतकातील कारखान्यातील कामगारासारखा फक्त धुराड्याखाली उभा नाही. तो अ‍ॅपवर लॉग-इन करणारा डिलिव्हरी बॉय आहे. तो कंत्राटी शिक्षक आहे. तो सुरक्षा रक्षक आहे. तो सफाई कर्मचारी आहे. तो आयटी कंपनीत रात्री झोप गमावणारा तरुण आहे. तो पीकविमा, कर्ज आणि बाजारभाव यांच्या कात्रीत अडकलेला शेतकरी आहे. तो घरकाम करणारी स्त्री आहे. तो बांधकामावरील मजूर आहे. तो स्वतःला ‘स्वयंरोजगारित’ समजणारा पण प्रत्यक्षात अल्गोरिदमचा गुलाम बनलेला गिग वर्कर आहे.
पूर्वी मालकाचा चेहरा दिसत होता; आज शोषणाचा चेहरा डिजिटल झाला आहे. पूर्वी कारखान्याचे गेट होते; आज अ‍ॅपचे लॉग-इन आहे. पूर्वी सायरन वाजत होता; आज मोबाईलची नोटिफिकेशन वाजते. पण पिळवणूक तशीच आहे. वरकड मूल्य आजही कामगाराच्या श्रमातूनच निर्माण होते. बदलले आहे ते शोषणाचे तंत्र, शोषणाची भाषा आणि शोषणाचा मुखवटा. म्हणून मार्क्स आजही आवश्यक आहे. आणि या शोषित माणसाच्या दु:खाकडे करुणेने, मानवी प्रतिष्ठेने पाहण्यासाठी बुद्धही तितकाच आवश्यक आहे.

जगात युद्धखोरी वाढत आहे. देशांच्या सीमा पेटत आहेत. शस्त्रांचा बाजार वाढत आहे. अण्वस्त्रांची स्पर्धा पुन्हा उभी राहत आहे. युद्धांत मरणारे सैनिक बहुतेक गरीब घरचे असतात, उद्ध्वस्त होणारे नागरिक सामान्य असतात, विस्थापित होणारे लोक निरपराध असतात; पण नफा कमावणारे शस्त्रव्यापारी आणि साम्राज्यवादी शक्ती असतात. युद्धाचा जयघोष करणारे बहुधा रणांगणापासून दूर असतात. म्हणून बुद्धाची शांतता आणि मार्क्स-लेनिनचा साम्राज्यवादविरोध आजही अत्यंत महत्त्वाचा आहे.
माणसाने युद्ध जिंकले तरी माणूस हरतो. कारण युद्धात शहरं जळतात, पण राख माणसाच्या विवेकाची होते. युद्धात सीमा बदलतात, पण मातांच्या कुशी रिकाम्या होतात. युद्धात राष्ट्रगीत वाजते, पण श्रमिकांच्या घामाचे, शेतकऱ्यांच्या पिकाचे, मुलांच्या भवितव्याचे रक्त होते. म्हणून बुद्ध म्हणतो की द्वेषाने द्वेष शमत नाही आणि मार्क्स म्हणतो की शोषणाच्या अंताशिवाय शांतता टिकत नाही. या दोन वाक्यांतच आजच्या जगाच्या उद्धाराचे बीज आहे.

आज महाराष्ट्र दिन आहे. महाराष्ट्र केवळ प्रशासकीय राज्य नाही. महाराष्ट्र ही संघर्षाची निर्मिती आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी हजारो लोकांनी लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर, शाहीर कॉ. आण्णाभाऊ साठे आणि असंख्य कामगार-कष्टकरी जनतेच्या लढ्यातून हा महाराष्ट्र उभा राहिला. १०६ हुतात्म्यांच्या रक्ताने हा महाराष्ट्र फुलला. म्हणून महाराष्ट्राच्या पायात केवळ भूगोल नाही; त्याच्या पायात रक्त आहे, विचार आहे, कामगारांचा घाम आहे आणि सांस्कृतिक विद्रोहाची परंपरा आहे.

मुंबईच्या गिरण्यांनी महाराष्ट्राचे राजकारण घडवले. गिरणी कामगारांनी केवळ कापड विणले नाहीत; त्यांनी महाराष्ट्राचा सामाजिक ताना-बाना विणला. त्यांच्या वस्त्यांतून शाहीर जन्मले, वाचन चळवळी उभ्या राहिल्या, कम्युनिस्ट विचार पसरला, बहुजन आणि कामगार यांच्या एकजुटीचे स्वप्न आकाराला आले. महाराष्ट्राचा संयुक्त लढा हा केवळ भाषेचा लढा नव्हता; तो कामगार, शेतकरी, बहुजन, कलाकार, लेखक, शाहिर, विचारवंत यांच्या सामूहिक अस्तित्वाचा लढा होता.

पुढे महाराष्ट्राने सहकाराचा मार्ग धरला. साखर कारखाने, दूध संघ, बँका, शिक्षण संस्था, बाजार समित्या या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाचा उदय झाला. शेतकरी संघटित झाला. शिक्षण गावात आले. सत्ता गावाकडे पोहोचली. परंतु हळूहळू सहकारातील समाजभाव कमी होत गेला आणि मालकीचा, गटबाजीचा, घराणेशाहीचा, सत्तास्पर्धेचा आणि आर्थिक स्वार्थाचा पसारा वाढू लागला. लोकसहकार लोप पावून नेत्यांचा खासगी साम्राज्यवाद निर्माण झाला. जे संस्थान लोकांच्या श्रमाने उभे राहिले, ती अनेक ठिकाणी काही घराण्यांची बालेकिल्ले बनली.

महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा प्रचंड आहे. शिवरायांचे रयतेचे राज्य, जिजाऊंची संस्कारभूमी, फुल्यांचे सत्यशोधक बंड, सावित्रीचे शिक्षणयुद्ध, शाहूंचा सामाजिक न्याय, आंबेडकरांचे संविधान, रमाईचे सहनशील धैर्य, अहिल्यादेवींचा लोकाभिमुख कारभार, फातिमा शेख यांचे शिक्षणातील योगदान, आण्णाभाऊंचा श्रमिक आवाज हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. पण या आत्म्यावर नंतर उजव्या सांस्कृतिक राजकारणाचे सावट पडू लागले.
महाराष्ट्रात कम्युनिस्ट कामगार चळवळ प्रभावी होती. गिरणी कामगारांच्या संघटनांनी भांडवलशाहीला प्रश्न विचारले. कामगाराला वर्गजाणीव मिळू लागली. अशा वेळी कामगारांची एकजूट मोडण्यासाठी, वर्गजाणीवेऐवजी प्रादेशिक अस्मिता पुढे करण्यासाठी शिवसेनेला खतपाणी घालण्यात आले, हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील उघड सत्य आहे. कामगारांचा प्रश्न ‘मालक विरुद्ध कामगार’ या स्वरूपातून ‘मराठी विरुद्ध अमराठी’ अशा दिशेने वळवण्यात आला. वर्गसंघर्षाचा आवाज अस्मितेच्या गर्जनेत दडपला गेला. कम्युनिस्टांना संपवण्यासाठी उभी केलेली शक्ती पुढे स्वतःच मोठी राजकीय शक्ती बनली.

परंतु इतिहासाची विडंबना पाहा. ज्यांनी उजव्या शक्तींचा वापर डाव्यांना रोखण्यासाठी केला, त्यांनाच नंतर त्या उजव्या शक्तींनी गिळायला सुरुवात केली. शिवसेना, जी एकेकाळी कम्युनिस्टविरोधी राजकारणाची फलश्रुती होती, तिलाच नंतर मोठ्या उजव्या राजकारणाने कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात कुरघोडीची, पक्ष फोडण्याची, सत्तेसाठी कोणतीही मर्यादा न पाळण्याची पद्धत आणखी उघडी केली. परिणामी एकेकाळी परस्परविरोधी वाटणाऱ्या शक्तींनाही लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, धर्मनिरपेक्षता वाचवण्यासाठी शिवसेनेसारख्या शक्तीशीही हातमिळवणी करावी लागली. हे विरोधाभासाचे राजकारण आहे; पण या विरोधाभासात लोकशाहीवरील संकटाचे गांभीर्य दिसते.

आज महाराष्ट्रात राजकीय नैतिकतेचा मोठा ऱ्हास झालेला दिसतो. पक्ष फोडणे, निवडून आलेल्या जनादेशाला पैशाच्या व सत्तेच्या बळावर वाकवणे, ईडी-सीबीआयच्या भीतीतून राजकीय निष्ठा बदलणे, विचारसरणीशिवाय फक्त सत्तेसाठी पक्षांतर करणे, लोकप्रतिनिधींनी लोकसेवकाऐवजी स्थानिक सरंजामदारासारखे वागणे हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. महाराष्ट्राची राजकीय परंपरा वैचारिक होती; आज ती व्यवहारिक नव्हे तर बाजारू होत चालली आहे.

याच पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळात भोंदूगिरी, अंधश्रद्धा, धार्मिक बाजार, चमत्कारवाद, बुवाबाजी आणि उघड टगेगिरी वाढताना दिसते. लोकांच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी भावनिक तमाशे उभे केले जातात. बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचे बाजारीकरण, शेतकरी संकट, कामगार असुरक्षा, स्त्रियांची सुरक्षा, आरोग्य व्यवस्था, पर्यावरण, पाणी, शेती या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा कमी; आणि आरडाओरडा, धमक्या, दहशत, जातीय-धार्मिक ध्रुवीकरण यावर राजकारण जास्त. संजय गायकवाडसारख्या आमदारांची टगेगिरी ही केवळ व्यक्तीची समस्या नाही; ती राजकारणातील संस्कारभ्रष्टतेची लक्षणे आहेत. जेव्हा विचार मागे पडतो तेव्हा भाषा गलिच्छ होते; जेव्हा लोकशाही कमकुवत होते तेव्हा धमकी राजकारणाचा भाग बनते; जेव्हा जनता संघटित नसते तेव्हा उर्मटपणा नेतृत्व समजला जातो.

म्हणून आज नव्या महाराष्ट्राचा संकल्प करणे गरजेचे आहे. हा संकल्प फक्त ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याचा नसावा; तर महाराष्ट्राला पुन्हा विचारांच्या आणि न्यायाच्या पायावर उभे करण्याचा असावा. या महाराष्ट्रात बुद्धाची करुणा असेल, मार्क्सचा श्रमिक न्याय असेल, शिवरायांची रयतेविषयीची बांधिलकी असेल, फुल्यांचा सत्यशोध असेल, शाहूंचा सामाजिक न्याय असेल, आंबेडकरांचे संविधान असेल. या महाराष्ट्रात जिजाऊंचा संस्कार, अहिल्यादेवींची लोकसेवा, सावित्रीचे शिक्षणधैर्य, रमाईचे त्यागमूल्य आणि फातिमा शेख यांचे ज्ञानसहकार्य असेल.

हा महाराष्ट्र अंधश्रद्धेचा नव्हे तर विज्ञानाचा असेल. तो भोंदूंचा नव्हे तर शिक्षकांचा असेल. तो दंगलींचा नव्हे तर संवादाचा असेल. तो टगेगिरीचा नव्हे तर संविधानिक शिस्तीचा असेल. तो काही घराण्यांचा नव्हे तर सर्वसामान्यांचा असेल. तो बाजाराचा गुलाम नव्हे तर श्रमाचा सन्मान करणारा असेल.

नव्या महाराष्ट्रासाठी सर्वप्रथम शिक्षण मुक्त करावे लागेल. शिक्षण हे बाजारातील वस्तू नसून मानवी मुक्तीचे साधन आहे. दुसरे म्हणजे कामगारांच्या बदलत्या स्वरूपाला कायदेशीर सुरक्षा द्यावी लागेल. गिग वर्कर असो, कंत्राटी कर्मचारी असो, घरकाम करणारी महिला असो, शेतमजूर असो, आयटी क्षेत्रातील अदृश्य श्रमिक असो सर्वांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य संरक्षण, निवृत्ती हक्क आणि सन्मानाचे वेतन मिळाले पाहिजे. तिसरे म्हणजे सहकार चळवळीचे पुनरुज्जीवन करावे लागेल. सहकार म्हणजे नेत्यांचा कारखाना नाही; सहकार म्हणजे लोकांची सामूहिक आर्थिक लोकशाही. चौथे म्हणजे राजकारणातील पैशाचे व गुंडगिरीचे वर्चस्व कमी करण्यासाठी जनतेने विचाराधारित राजकीय हस्तक्षेप वाढवला पाहिजे. पाचवे म्हणजे जात, धर्म, भाषा, प्रदेश यांच्या नावाने माणसांना भिडवणाऱ्या राजकारणाला उघडे पाडले पाहिजे. सहावे म्हणजे स्त्रियांच्या स्वातंत्र्याला समाजपरिवर्तनाच्या केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. सावित्रीशिवाय फुले अपूर्ण आहेत; रमाईशिवाय बाबासाहेबांचा संघर्ष समजत नाही; जिजाऊशिवाय शिवराय समजत नाहीत.

आज बुद्ध पौर्णिमा आपल्याला मनात करुणा पेटवायला सांगते. कामगार दिन श्रमाला न्याय द्यायला सांगतो. महाराष्ट्र दिन इतिहासातील हुतात्म्यांची शपथ विसरू नका असे सांगतो. या तिन्ही संदेशांचा संगम म्हणजे नव्या महाराष्ट्राचे घोषणापत्र आहे.

आपल्याला असा महाराष्ट्र हवा आहे की जिथे धर्म माणसाला विभाजित करणार नाही, तर नैतिक करुणेकडे नेईल; जिथे राजकारण सत्ता मिळवण्याचे साधन नसून समाज बदलण्याचे माध्यम असेल; जिथे अर्थव्यवस्था नफ्यासाठी नव्हे तर मानवी गरजांसाठी असेल; जिथे विज्ञानाला मानवतेची जोड असेल; जिथे कामगार, शेतकरी, स्त्री, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, युवक, विद्यार्थी अशा सर्वांच्या प्रतिष्ठेला मध्यवर्ती स्थान असेल.
बुद्धाने सांगितले, “अत्त दीप भव”; स्वतःचा दीप स्वतः बना. मार्क्सने सांगितले, “जगातील कामगारांनो, एक व्हा.” आंबेडकरांनी सांगितले — “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.” या तिन्ही घोषणांचा एकच अर्थ आहे की मुक्ती कुणी देत नाही; ती मिळवावी लागते. ती मिळवण्यासाठी ज्ञान, संघटन, करुणा, संघर्ष आणि नैतिक धैर्य लागते.

आज आपण या तिन्ही दिवसांच्या संगमावर उभे राहून संकल्प करूया;
युद्धखोरीविरुद्ध शांततेचा, नफेखोरीविरुद्ध श्रमन्यायाचा,
विषमतेविरुद्ध समतेचा,
अंधश्रद्धेविरुद्ध विज्ञानाचा,
द्वेषाविरुद्ध बंधुतेचा,
टगेगिरीविरुद्ध संविधानाचा,
आणि निराशेविरुद्ध नव्या महाराष्ट्राचा.

हा महाराष्ट्र केवळ नकाशावर निर्माण झालेला नाही; तो संघर्षातून निर्माण झाला आहे. आता त्याची पुनर्निर्मितीही संघर्षातूनच होईल. बुद्धाच्या करुणेचा दीप, मार्क्सच्या वर्गजाणिवेची मशाल, फुले-शाहू-आंबेडकरांच्या न्यायाचा मार्ग आणि शिवरायांच्या रयतेच्या राज्याची प्रेरणा घेऊन आपण पुढे गेलो, तर महाराष्ट्र पुन्हा देशालाच नव्हे तर जगाला दिशा देऊ शकतो.

जय भीम. लाल सलाम. जय महाराष्ट्र.

© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india