लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय तरुणीवर चार वर्षे लैंगिक अत्याचार; जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नराधमासह नातेवाईकांवर गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी :-धाराशिव जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होताना दिसून येत आहे. खोट्या अमिषाचा आणखी एक बळी.
लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २१ वर्षीय तरुणीवर तब्बल चार वर्षे अत्याचार केल्याची आणि फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिच्या कुटुंबाला मारहाण व धमकी देणाऱ्या नातेवाईकांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २१ वर्षीय तरुणीला एका गावातील नराधम तरुणाने लग्नाचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पाडून आरोपीने ऑक्टोबर २०२२ ते १ एप्रिल २०२६ या प्रदीर्घ कालावधीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. मात्र, लग्नाची वेळ आली असता आरोपीने लग्न करण्यास साफ नकार देत तरुणीची फसवणूक केली.
कुटुंबाला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
पीडितेने या कृत्याला विरोध केला असता किंवा वाच्यता करण्याचा प्रयत्न केला असता, मुख्य आरोपीच्या नातेवाईकांनी पीडितेला आणि तिच्या आई-भावाला बेदम मारहाण केली. “जर याबद्दल कोणाला काही सांगितले, तर तुम्हा सर्वांना जीवे ठार मारू,” अशी गंभीर धमकीही या नातेवाईकांनी पीडित कुटुंबाला दिली.
या सततच्या त्रासाला आणि अन्यायाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने नळदुर्ग पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पीडितेने १५ मे २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरी अहवालावरून (FIR) नळदुर्ग पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ (लग्नाचे खोटे वचन देऊन लैंगिक संबंध ठेवणे), ३१८(४) (फसवणूक करणे) आणि ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
(कायदेशीर नियमांनुसार पीडितेचे नाव आणि गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.)
सततच्या वाढत्या महिला अत्याचार घटनांमुळे
सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उळललेली आहे. सदरच्या घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी प्रभावी मागणी होत आहे.






