गोकुळ शुगर लि.धोत्री थकीत ऊस बिलासाठी शेतकरी संघर्ष समिती उद्या बुधवार दि. १० जून रोजी सोलापूर येथील कंबर तलावात जलसमाधी आंदोलन करणार : थकीत ऊस बिल मिळेपर्यंत विविध मार्गाने आंदोलन सुरूचं राहणार शेतकरी संघर्ष समितीचा निर्धार पक्का
——————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
गोकूळ शुगर लि. धोत्री थकित ऊस बिल शेतकरी व शेतकरी संघर्ष समिती तुळजापूर व अक्कलकोट यांच्या वतीने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गोकुळ शुगर लि.धोत्री थकीत ऊस बिल मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी ध धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (कंबर तलाव ) विजापूर रोड सोलापूर येथे दि.१० जून २०२६ वार बुधवार रोजी दुपारी ठिक १२.०० वा.जलसमाधी आंदोलन करण्यासाठी कंबर कसली असून जोपर्यंत थकीत ऊस बिल मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन विविध मार्गाने सुरूच राहणार असा निर्धार आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.
. पोटाला चिमटा देऊन रात्रीचा दिवस करून चटणी भाकर खाऊन दिवस रात्र उसाच्या फडात उभे राहून मुलांचे शिक्षण, मुलीचं लग्न थाटामाटात करण्याचे स्वप्न पहात पोटच्या लेकरागत ऊसाला जोपासलं वेळच्यावेळी खत पाणी घालून ऊस वाढवला पोसला आणि शेवटी कसायाच्या हातात दिला.असी दुर्दैवी अवस्था ऊस उत्पादक शेतकऱ्याची झाली असून गेंड्याची कातडी पांघरून निर्ढावलेल्या गोकुळ शुगर लिं. धोत्रीच्या मालक चालकाने अजून शेतकऱ्याच्या हातात एक दमडीही दिली नाही त्यामुळे सहनशीलतेचा बांध तुटून शेतकरी राजाला शेवटी रस्त्यावर उतरण्याची वेळ गोकुळ शुगर लि.धोत्रीच्या चे सर्वा सर्व चालक मालक यांनी आणली आहे.घरदार सोडून लेकरं बाळापासून दूर होऊन सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालया जवळ पूनम गेट समोर गोकुळ शुगर लि. धोत्री चे थकीत बिल मिळावे म्हणून आंदोलन करत असलेल्या धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही व्यथा आणि वेदना आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून थकीत ऊस बिल मिळावे म्हणून धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट वर या आंदोलनाला सुरुवात केली वेगवेगळ्या पध्दतीने भारतीय संविधानाने दिलेल्या घतनात्मक हक्कानुसार सनदशीर मार्गाने शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात धाराशिव जिल्ह्यातील वागदरी,येडोळा,खुदावाडी सह सोलापूर जिल्ह्यातील . जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा समावेश आहे.गोकुळ शुगर लि. धोत्री चे चालक-मालक संबंधित प्रशासन यांनी शेतकऱ्यांना दिशाभूल करून त्यांच्या फडातून ऊस घेऊन गेले कोणाचा शंभर टन कोणाचा अडीचशे ते तिन चारशे टन या प्रमाणे हजारो टन ऊस गोकुळ शुगर लि.ने गाळपासाठी घेतला परंतु दिलेला एकही शब्द न पाळता अद्याप शेतकऱ्याच्या हातावर एक दमडीही ठेवली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसा पासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तर दि.४जून रोजी अर्ध नग्न आंदोलन करून शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले परंतु डोळ्यावर पट्टी तोंडावर बोट कानात गोळा घालून बसल्यागत संबंधित प्रशासनाने अद्याप म्हणावी तशी दखल या शेतकरी आंदोलनाची घेतली नाही म्हणून दि.१० जून २o२६ रोजी सोलापूर येथील कंबर तलावात जलसमाधी आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या आंदोलनास पोलीस उपायुक्तानी भेट दिली असता शेतकऱ्यानी सांगीतले की जोपर्यंत थकीत ऊस बिल मिळत नाही तोपर्यंत हे गोकुळ शुगर लि.धोत्री थकीत ऊस बिल आंदोलन सुरूच राहणार आहे.
या आंदोलनात शेतकरी संघर्ष समितीचे आरविंद घोडके,अमोल पाटील, जितेंद्र पाटील, खंडू कचरे, नामदेव महाबोले सह धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी आहेत.







