Best News Portal Development Company In India

धर्ममार्तंडांच्या विरोधात सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष : भारतीय स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीचा पाया!

*धर्ममार्तंडांच्या विरोधात सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष : भारतीय स्त्रीशिक्षणाच्या क्रांतीचा पाया*

*लेखक : भूमिपुत्र वाघ*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

मित्रांनो आज आपण एका नवीन विषयाकडे वळणार आहोत. हा विषय सर्वांचा आहे. प्रत्येक माणसाला महात्मा ज्योतिबा फुले सावित्री माता फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ अशा अनेक थोर महामानवांच्या इतिहासाबद्दल माहिती आहे. परंतु त्या विचाराला उजळा निर्माण व्हावा ते विचार जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचावे प्रत्येक माणसाला सावित्री माता फुले यांनी केलेले कार्य माहीत व्हावं, कार्याची आणि विचाराची उजळणी होत राहावी.म्हणून भूमिपुत्र वाघ यांचा अटहास आहे.
. भारतातील स्त्रीशिक्षणाचा इतिहास लिहिताना यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जात आहे.त्यांनी केवळ मुलींना शिक्षण दिले नाही, तर स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हा विचार प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर मांडला. त्या काळातील सनातनी विचारसरणी, धर्ममार्तंडांचा विरोध, सामाजिक बहिष्कार, अपमान, दगडफेक, शेणफेक आणि मानसिक छळ या सर्व संकटांना तोंड देत त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. त्यांचा संघर्ष हा केवळ शिक्षणासाठी नव्हता, तर समता, न्याय आणि मानवतेच्या पुनर्स्थापनेसाठी होता. त्यामुळेच आज त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत म्हणून ओळखल्या जातात.
एकोणिसाव्या शतकातील भारतीय समाजात स्त्रीला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. स्त्रीचे स्थान केवळ घरापुरते मर्यादित ठेवण्यात आले होते. जातीव्यवस्था, अंधश्रद्धा आणि धार्मिक रूढींनी समाजाला जखडून ठेवले होते. अशा काळात सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची मशाल पेटवली. हा निर्णय त्या काळातील समाजासाठी क्रांतिकारक होता. धर्माच्या नावाखाली विरोध करणाऱ्या मंडळींनी त्यांचा सातत्याने छळ केला, परंतु त्यांनी समाजहिताचा मार्ग सोडला नाही.
धर्ममार्तंडांचा विरोध
सावित्रीबाई शाळेत जात असताना अनेक लोक त्यांच्या अंगावर दगड, चिखल आणि शेण फेकत असत. त्यांना शिवीगाळ केली जात असे. समाजातून बहिष्कृत करण्याचा प्रयत्न झाला. त्यांचे कुटुंबही दबावाखाली आले. धर्म बुडेल, स्त्रिया शिक्षित झाल्या तर समाज नष्ट होईल, अशा अफवा पसरवल्या गेल्या.
परंतु सावित्रीबाई दररोज अतिरिक्त साडी घेऊन घराबाहेर पडत. शाळेत पोहोचल्यावर मळलेली साडी बदलून त्या विद्यार्थिनींना प्रेमाने शिकवत असत. हा प्रसंग त्यांच्या मानसिक सामर्थ्याचा आणि कार्यनिष्ठेचा सर्वोच्च आदर्श आहे.
संघर्षातून निर्माण झालेली क्रांती
सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा सुरू केली. दलित, शोषित आणि वंचित समाजातील मुलांनाही शिक्षणाची दारे खुली केली. विधवांसाठी आश्रय, अनाथ मुलांची काळजी, स्त्रियांच्या सन्मानासाठी अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, हा संदेश त्यांनी कृतीतून दिला.
सामाजिक परिवर्तनातील योगदान
आज भारतातील लाखो महिला शिक्षिका, डॉक्टर, अभियंते, न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक आणि उद्योजिका या सावित्रीबाईंच्या संघर्षाचे फळ आहेत. त्यांनी पेटविलेली शिक्षणाची ज्योत आज संपूर्ण देश उजळत आहे. स्त्रीशिक्षण हा आज मूलभूत अधिकार मानला जातो, यामागे त्यांच्या त्यागाचा मोठा वाटा आहे.
धर्ममार्तंडांनी सावित्रीबाई फुले यांचा अमानुष छळ केला. त्यांना अपमानित केले, परंतु त्यांनी अन्यायापुढे कधीही हार मानली नाही. त्यांचे धैर्य, चिकाटी आणि समाजासाठीचे समर्पण यामुळेच त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. त्यांचा संघर्ष हा प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे. समाजातील परिवर्तनासाठी विचार, शिक्षण आणि कृती यांची सांगड आवश्यक असते, हे त्यांच्या जीवनातून स्पष्ट होते.
आज सावित्रीबाई फुले यांचे कार्य हे केवळ इतिहास नसून आधुनिक भारताच्या सामाजिक न्याय, स्त्रीसमानता आणि शिक्षणव्यवस्थेचा भक्कम पाया आहे. त्यांच्या संघर्षामुळे भारतीय समाजाला नव्या युगाची दिशा मिळाली. म्हणूनच प्रत्येक भारतीयाने त्यांच्या विचारांचे जतन करून शिक्षण, समता आणि मानवतेचा संदेश पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल…
*मग मला प्रश्न पडतो.*
शिक्षणापासून दलित आणि बहूजनांना बहिष्कृत करणारा धर्म आमचा कसा??
प्रश्न पडतो या जगाची निर्माता आई असेल ती जर अज्ञानी ठेवली गेली तर या देशाचा विकास कसा होईल?
भारतीय संस्कृतीमध्ये आईला देवी म्हटलंआहे मग या धर्ममार्तंडानी त्याच आईला बहिष्कृत का केलं?
दिन दलित बहुजन यांना शिक्षणापासून अंधारात का ठेवलं ?
आजही अंधभक्त हाच विचार घेऊन मनुस्मृतीचा पुरस्कार करतात हे आपल्याला डोळसपणे दिसत नाही काय??
देवीच्या मंदिरामध्ये उघडे पुरुष पुजारी कसे? हे सुद्धा धर्म मार्तंडाचा बहूजणांना भावुकतेच्या, श्रद्धेच्या नावाखाली पीळणारा स्वतंत्र मार्ग आहे असे वाटत नाही का??..

पेटू दे रान आता
मशाल तेवत ठेवू
नवराष्ट्र निर्मानासाठी
माय येकोप्याने पुढे जाऊ….

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india