काल आरोप, आज सत्कार; हा विरोध होता की राजकीय दिखाऊपणा?
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
ड्रग्ज प्रकरणाच्या नावाखाली विनोद उर्फे पिटू गंगणे यांच्यावर आरोपांचे रान उठवणारे, नैतिकतेचे गाजर दाखवणारे विरोधक आणि काही नेते मंडळी आज मात्र तुळजापूरच्या राजकारणात वेगळेच चित्र रंगवताना दिसत आहेत.
तुळजापूरच्या सुज्ञ जनतेने नगराध्यक्ष पदाचा मुकूट थेट विनोद गंगणे यांच्या मस्तकावर चढवताच, कालपर्यंत विरोधाची भाषा बोलणारेच आज त्यांच्या सत्कारात व्यस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हा बदल नेमका कशामुळे?
काल जे आरोप केले गेले, ते खरे होते की केवळ निवडणुकीपुरते राजकीय अस्त्र होते?
जनतेचा कौल लागल्यानंतर अचानक सूर बदलणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी नव्हे तर काय, असा सवाल आता तुळजापूरकर विचारू लागले आहेत.
जनतेने स्पष्ट निर्णय दिल्यानंतर विरोधकांची भूमिका बदलणे हा लोकशाहीचा स्वीकार आहे, की सत्तेच्या जवळ राहण्यासाठीचा सोयीस्कर मार्ग, यावर चर्चा रंगू लागली आहे.
जनतेने ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनाच स्वीकारायला अखेर विरोधकांनाही भाग पडले, हेच या निवडणुकीचे सर्वात मोठे उत्तर असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.






