गडकोट विकास महामंडळाच्या मागणीसाठी तुळजापुरात आमरण उपोषण!
जागर प्रतिष्ठानचे संस्थापक किसन चव्हाण यांचा इशारा; गडकिल्ले संवर्धनासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा
तुळजापूर : स्वराज्यातील गडकिल्ले, मावळ्यांच्या समाध्या, ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने “गडकोट विकास महामंडळ” स्थापन करावे या मागणीसाठी जागर प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष किसन प्रभाकर चव्हाण यांनी तुळजापूर येथे आमरण उपोषणाचा इशारा देत उपोषणात सुरुवात झाली आहे. या संदर्भात त्यांनी तुळजापूर तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलनाची माहिती दिली आहे.
महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झाली असून स्वराज्य उभारण्यात गडकिल्ल्यांचे मोठे योगदान आहे. मात्र आज अनेक गडकिल्ले दुर्लक्षित अवस्थेत असून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे. शासन पातळीवर ठोस निर्णय घेतल्याशिवाय दुर्गसंवर्धन शक्य नसल्याने गडकोट विकास महामंडळ स्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यासाठी जागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गसंवर्धन मोहीम राबवली जात आहे. विविध लोकप्रतिनिधींमार्फत निवेदने देऊन पाठपुरावा केला असतानाही मागण्यांवर निर्णय न झाल्याने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या आहेत प्रमुख मागण्या
▪️स्वराज्यातील गडकिल्ले, मावळ्यांच्या समाध्या व ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी ‘गडकोट विकास महामंडळ’ स्थापन करावे
▪️गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवावीत
▪️प्रत्येक गडावर भगवा ध्वज कायमस्वरूपी बसवावा
▪️छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी प्रत्येक गडावर शासकीय स्तरावर स्वराज्य ध्वज फडकवावा
▪️वाईन शॉप, बिअर बार किंवा दारूच्या दुकानांना गडकिल्ले व महापुरुषांची नावे वापरण्यास बंदी घालावी
या सर्व मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून गडकिल्ले वाचवण्यासाठी ५ मार्च २०२६ रोजी श्रीक्षेत्र तुळजापूर येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.उपोषण कर्ते किसन चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.






