अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे सिंदफळ येथे ज्वारीचे पीक जळण्याचा धोका; अग्निशामक दलाच्या तत्परतेने पाच एकर पीक वाचले!
तुळजापूर : तालुक्यातील सिंदफळ गावाजवळील शेता शेजारी अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक जळण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र तुळजापूर अग्निशामक दलाच्या सतर्कता आणि तातडीच्या कारवाईमुळे आग वेळेत आटोक्यात आणण्यात आली आणि सुमारे पाच एकर ज्वारीचे पीक मोठ्या नुकसानीपासून वाचले.
ही घटना ७ मार्च रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली. शेतकरी विक्रम सोनवणे व शेतकरी गणेश पवार यांच्या शेतातील ज्वारीच्या पिकाला आगीमुळे धोका असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ तुळजापूर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला माहिती दिली.
माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी अवघ्या काही वेळात परिस्थिती नियंत्रणात आणत आगीवर पाणी मारून आग पूर्णपणे विझवली. त्यामुळे आगीचा फैलाव थांबवण्यात यश आले आणि शेजारील शेतांमधील पिकेही सुरक्षित राहिली.
या बचावकार्यात विभाग प्रमुख देविदास देवकते, आजिरत्न सोनवणे, संजय बनसोडे महावीर सुरती(वाहन चालक) आणि शुभम साळुंखे अग्निशामक दलातील जवानांनी धाडसाने काम करत आग नियंत्रणात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले.
दरम्यान, ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचा संशय व्यक्त केला जात असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी व नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन तुळजापूर अग्निशामक दलाकडून करण्यात आले आहे.
अग्निशामक दलाच्या या तत्पर कामगिरीबद्दल सिंदफळ परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी जवानांचे कौतुक केले.






