उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजनेच्या सह अध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल शरण पाटील यांचा महसुल विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेती व शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळावी व शेतमाल थेट बाजारपेठेत पोहोचवता यावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत उमरगा लोहारा विधानसभा सह-अध्यक्षपदी शरण बसवराज पाटील यांची निवड करण्यात केली आहे. या निवडीनंतर शरण पाटील यांनी सोमवारी (दि.१६) उमरगा तहसील कार्यालयात सदिच्छा भेट देऊन या योजनेची माहिती, विविध शासन निर्णय, या योजनेतून कोणते रस्ते घेता येतील, येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना याबाबत महसुल विभाग व विविध विभागातील अधिकारी व शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महसूल विभागाच्या वतीने त्यांचा महसुल विभागाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना शरण पाटील म्हणाले की, चांगल्या शेतरस्त्यामुळे शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळेल, दुग्धव्यवसाय, भाजीपाला उत्पादन, फळबागा, कुक्कुटपालन, शेळीपालन यांसारख्या व्यवसायांसाठी वेळेत वाहतूक होईल. रस्त्यांच्या मजबुतीकरणामुळे शेतमाल थेट बाजारपेठेत पोहोचविणे शक्य होते. मजबुत शेतरसहा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महसुल विभाग व शरण पाटील फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उमरगा व लोहारा तालुक्यातील कांही शेतरस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत तर उर्वरीत रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. या कामाचा पूर्वानुभव लक्षात घेऊन मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना प्रभावीपणे राबवून दोन्ही तालुके पाणंदमुक्त करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार गोविंद येरमे, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, योगेश राठोड, उपविभागीय अभियंता दिलीप बिराजदार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






