धाराशिव–उमरगा–लोहारा मतदारसंघातील अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी – आमदारांची मागणी
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
दि. १८ रोजी मुंबई येथे विधान भवनामध्ये येथे धाराशिवचे आमदार कैलास पाटील व उमरगा–लोहारा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन दि. १७मार्च २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीमुळे झालेल्या शेती नुकसानाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
मंगळवार, दि. १७मार्च २०२६ रोजी धाराशिव–उमरगा–लोहारा मतदारसंघात दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. द्राक्ष, केळी, आंबा तसेच विविध फळबागांसह कांदा, हरभरा, गहू, ज्वारी यांसारख्या पिकांचे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
विशेषतः गारपीटीमुळे अनेक ठिकाणी उभी पिके जमिनीवर आडवी पडली असून, हातातोंडाशी आलेले पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना विलंब न करता नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदारांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे.
शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.







