सामाजिक समता हवी असेल तर फुले-शाहु- आंबेडकर यांच्या विचारांची कास धरावी लागेल
प्रा.किरण सगर
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
लोहारा तालुक्यातील वडगाव (गांजा) येथे महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडक जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग धाराशिव यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या व्दिशताब्दी वर्षानिमित्त तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान जिल्हातील विविध भागात सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत दि. ११ एप्रिल रोजी वडगाव ता.लोहारा जिल्हा धाराशिव येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन कवले हे अध्यक्षस्थानी होते तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी सरचिटणीस प्रा.किरण सगर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी विचारमंचावर समाज कल्याण अधिकारी श्री सनम लामकने, मुरूम नगरपरिषदेचे नगराधिकारी सचिन भुजबळ, प बार्टीचे प्रकल्प अधिकारी तुषार कदम , उपसरपंच बबन फुलसुंदर, शालेय समिती अध्यक्ष सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतानां सगर म्हणाले की, समाजातील अनिष्ट रुढी परंपरा नष्ट करणे, जाती निर्मुलन, स्त्री पुरुष समानता, लग्नातील अनाठायी खर्च, व्यसनमुक्ती, हुंडाबळी,नरबळी, शेतकरी आत्महत्या यावर खऱ्या अर्थाने योग्य दिशेने कार्य करावयाचे असल्यास, महामानवाच्या स्वप्नातील भारत घडवायचा असेल तर त्यांच्या विचारांचे कृतीशील अनुकरण करावे लागेल त्या शिवाय पर्याय नाही असे मत मांडत सविस्तर मार्गदर्शन केले.
तर सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, स्वाधार योजना, ऍट्रॉ्सिटी कायदा, बचत गटानां ट्रॅक्टर वाटप, जातपाडताळणी, थोर महामानवांच्या जयंती साजरी करणे या बद्दल माहिती दिली.
मान्यवरांच्या हस्ते गावातील नव्याने पोलीस व सैन्यात भरती झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तर सरपंच बबन फुलसुंदर यांच्याकडून रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून पाण्याचे जार वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश फुलसुंदर यांनी केले, प्रास्ताविक तुषार कदम यांनी केले तर आभार ग्रामसेवक जी.व्ही. करदोरे यांनी मानले. कार्यक्रमास गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यासागर फुलसुंदर, प्रभाकर साळुंके, विलास फुलसुंदर, डॉ ज्ञानेश्वर फुलसुंदर, पै सोमनाथ फुलसुंदर, अमोल साळुंके, महावीर माळी, राजेश फुलसुंदर, पंडित पवार, बबन बेळे, ज्ञानेश्वर भुजबळ, आकाश भुस्कंडे, बापू फुलसुंदर,संजय फुलसुंदर, सोमनाथ साळुंके,ऋषीं बिराजदार, गोविंद लोखण्डे, गणेश पाटील, विद्यासागर पाटील, दशरथ माळीमहादेव गायकवाड, विशाल हिरवे यांनी प्रयत्न केले.
या सप्ताहानिमित्त रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, प्रबोधनपर व्याख्यान आदी घेण्यात आले.यात ५२ युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले तर ९८ गरजू ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
समतादूत नागेश फुलसुंदर,किरण चिंचोले, रमेश नरवडे, गणेश मोटे, गोविंद लोमटे, सुहास वाघमारे, अर्चना रणदिवे आदींनी विशेष उल्लेखनीय परिश्रम घेतले.








