पुरुषांच्या टोळक्याकडून महिलेचा विनयभंग आणि पतीवर जीवघेणा हल्ला ; तुळजापूर तालुक्यातील धक्कादायक घटना!
तुळजापूर (धाराशिव):मागील भांडणाचा राग मनात धरून किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत होऊन एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची आणि तिच्या पतीला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना पांगरधरवाडी (ता. तुळजापूर) येथे घडली आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी महिला अश्विनी महादेव गायकवाड या घरासमोर असताना, पूजा मते यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून जुन्या वादाची कुरापत काढून आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे स्वरूप इतके वाढले की, आरोपींनी पीडित महिलेचा हात धरून ओढाओढी करत तिचा विनयभंग केला.
पतीवर लोखंडी रॉडने वार
महिलेचे पती महादेव गायकवाड हे भांडण सोडवण्यासाठी आले असता, आरोपींनी त्यांनाही लक्ष्य केले. आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने महादेव यांच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर प्रहार केले. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या जबड्याला मोठी इजा झाली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
१. पूजा संभाजी मते
२. संभाजी तानाजी मते
३. बापू तानाजी मते
४. तानाजी भिवा मते (सर्व रा. पांगरधरवाडी)
पोलीस कारवाई
तामलवाडी पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) आणि ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या’ (Atrocities Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक निलेश विश्वासराव देशमुख करत आहेत.
भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपींना कडक शासन करण्याची मागणी होत आहे.आरोपींचा माग लागत नाही हे विशेष. पीडित व्यक्तीला न्याय मिळावा हीच सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.








