*विवेक आणी धार्मिकता*
*लेखक भूमिपुत्र वाघ.*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
मित्रांनो,जगभरात दान,गुप्त दान करण्याचा रेशो पाहिला तर तो भारतात सर्वात जास्त आहे,हे दान सर्वच धर्मातील लोक आपल्या आवडीच्या धार्मिक स्थळाना देताना जास्त दिसतात.
बऱ्याच वेळ श्रद्धेपोटी लोक दान-धर्म करतात.श्रद्धा संपली की भीतीपोटी लोक दान करतात.भीती संपली की अंधश्रद्धे पोटी लोक दान करतात.काही लोक पापातून मुक्ती मिळवीण्यासाठी दान करतात. खरं तर सर्व मानवी मनाचे कंगोरे आहेत.भक्ती,दया,श्रद्धा, अंधश्रद्धा, पाप मुक्तता, या भावनेच्या आधारावर हे दान धर्म म्हणून केल्याचे दिसते.सोबत इच्छापूर्तीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी ह्याही गोष्टीसाठी लोक दान धर्म करतात.त्यातील चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टीचं चिंतन आपण आज करणार आहोत.
विवेक जागृत ठेवून ज्या ज्या गोष्टी आपण करतो त्या चांगल्या आसतात. असं समाजमन बोलते.
प्रथम आपण विवेकी विचारातून केलेल्या कार्याबद्दल विवेचन करणार आहोत.श्रद्धा,भाव,भक्ती या माध्यमातून जे दान आपण आपल्या धार्मिक स्थळांना देतो,लोकांना मदत मदत करतो,पिढीतांना मदत करतो.ते सर्वात छान आहे.यातून माणसाला आनंद मिळतो.समाजात मान्यता मिळते. त्या व्यक्तीचं कौतुकही होतं.जसे विविध सण, उत्सव,महोत्सव असतात,त्यावेळी आपण जेवण देतो.धन दान करतो. त्यातून त्या माणसांना, दान दात्यांना समाधान आणि आनंदही मिळतो. सामाजिक प्रतिष्ठाही मिळते. या दानाला या, मदतीला समाजामध्ये विशेष स्थान दिलं जातं. कारण ते दान हे निस्वार्थ भावनेनी दिलेले असते.मग ते दानपेटीत देऊ देत.जेवणावळी घालू देत.त्या अन्नदानाला विशेष स्थान प्राप्त झालेला आहे. प्रत्येक धर्माच्या रीतीरिवाजामध्ये अन्नदानाला विशेष महत्त्व आणि स्थान दिलेला आहे. त्या दान दात्याला पुण्यवान व्यक्ती असेही संबोधले जाते.त्यातून समाजमनाची निर्मिती होते.लोक चांगुलपणा पाहत असतात.तसंच अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. यातून दायित्वाची भावना निर्माण होते.परोपकाराची भावना निर्माण होते.तेव्हा अशा कार्य करणाऱ्यांना, दानशूर म्हणूनही संबोधले जाते.अशा पद्धतीची मदत,अशा पद्धतीचं दान,अशा पद्धतीचे कार्य हे सामाजिक बदलासाठी समाजमन तयार करण्यासाठी दायित्वाची भावना निर्माण करण्यासाठी होते.म्हणून अशा दानाला समाजामध्ये विशेष मान्यता आहे.त्या दानामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो.फक्त भाव आणि भक्तीचा संगम असतो.
आता आपण अविवेकी दान म्हणजे काय? त्याचा विचार करणार आहोत. अंधश्रद्धेच्या पोटी केलेलं दान,पापातून मुक्ती मिळविण्यासाठी केलेलं दान,प्रतिष्ठेसाठी आणी मोठेपणा मिळविण्यासाठी केलेलं दान.धन मिळविण्यासाठी केलेले दान यास मानवी धर्म मान्यता देत नाही. समाज मान्यता देत नाही.जो असे कृत्य करतो, त्यालाही समाधान मिळत नाही. कारण तो आशा घेऊन येत असतो. अपेक्षा घेऊन तो दान करत असतो. काही मागणी करत असतो. काही मिळवण्यासाठी तो कधीकधी बळीही देत असतो. यामध्ये पशुबळी असेल,नरबळी असेल असे अविवेकी कार्य तो करत असतो.पाप केलं म्हणून मुक्ती मिळविण्यासाठी धार्मिक स्थळांना देणगी देतो.गुप्तदान करतो, नावासाठी,प्रतिष्ठा मिळवण्यासाठी दान करणारे असेही महाभाग भरपूर दिसतात. मी दान दाता आहे हा अविर्भाव समजाला दाखवण्याचा अटहास ते करत असतात. इतका आटापिटा करूनही त्यांना शांतता मिळत नाही. शांत झोप लागत नाही. किंवा आनंद मिळत नाही. किंवा पुण्य केल्याचं समाधान मिळत नाही.पाप केल्यानंतर देवाचा प्रकोप होऊ नये,म्हणून देवाला बळी दिला जातो.भीतीपोटी, देवाला वश करून घेण्यासाठी, लाच या पद्धतीने देवाला दान करतात.आणि मागणी घालतात, देवा माझं भलं कर.मला माफ कर.देवा मी चुकलो. मी तुला पैसे देतो. सोनं देतो. बकरं कापतो. कोंबड कापतो. जमल्यास नरबळी देतो. इथपर्यंत माणूस जातो आणि देवाला खरेदी करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.
मित्रांनो खरं बोलायचं झालं तर विवेक जागृत ठेवून, सत्याचं वास्तव समोर ठेवून, विज्ञान वाद स्वीकारून, चिंतन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
तुमच्या माझ्या भाबड्या कल्पनेचा विचार करून खरच देव आहे असे गृहीत धरून आपण काम करायला लागलो तर, जो देव सृष्टीचा निर्माता आहे. त्यानं हवे तसे,प्राणी, पक्षी, झाडे फुल झाडे किती-किती हर तऱ्हेनी सृष्टी निर्माण केली आहे. लाखो रंग वापरलेले आहेत. हुरळून जावं एव्हढी सुंदर सृष्टी निर्माण केली आहे. विविध प्रकारचे लाखो जीव निर्माण केलेले आहे.त्याला हवं तसं निर्माण करतो. त्याला नको वाटलं तर तो समाप्त करतो.तोच करतो आणि तोच मारतो. तर मग आपल्यासारख्या शूद्र माणसाकडून एखादा बळी घेण्याची त्याची इच्छा कशी व्हावी .ह्या सर्व माणसांच्या मनाच्या विकृत आणि स्वार्थी कंगोऱ्याचा भाग आहे.
माणसांच्या गरजा, पुर्ण करण्यासाठी पैसा असेल,सोनं असेल, किंवा इतर वस्तू असतील ही साधने माणसाच्या सोयी आणि सुविधा निर्माण करण्यासाठी माणसाने निर्माण केलेल्या आहेत. देव आहे असं गृहीत धरले तर जो देव ह्या पृथ्वीचा निर्माता आहे. त्याला तुमच्या कागदी नोटाचा काहीच उपयोग नाही. त्याला त्याची गरजच नाही.कारण तो सर्व करता करावीत आहे.त्या साधनाचा, त्या पैशाचा, त्या सोन्याचा देवाला काहीच उपयोग नाही.त्याला काहीच घेणं देणं नाही. जर निर्मिती ही त्याचीच असेल तर आपण त्याला परत द्यायची गरज काय.? हे विश्व त्याचं असेल तर आपण निर्माण करून त्याला देणारे कोण? कुणीतरी लुटारू आपल्याला भीती दाखवतो,आणि त्या भीतीतून मुक्त होण्यासाठी आपण देवाला वश करण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व धादांत खोटे आहे. चुकीचं आहे. काल्पनिक आहे.अशा गोष्टीवर विश्वास ठेवून कुठलेच कार्य माणसांनी करू नये.आपण आपल्या पैशाच्या, सोन्याच्या जोरावरती देवाला खरेदी करतो,असा त्याचा अर्थ आहे.आणि हे सर्व खऱ्या अर्थाने निरर्थक आहे.चुकीच आहे.यातून देवाचं समाधान नाही,ना तुमचं नाही. मग हा उठा ठेऊ कशासाठी?
हे चिंतन, हा अभ्यास ज्या लोकांचा विवेक जागृत असतो ते लोक तसे वर्तन करत नाहीत.
आपण मागील पाच-पन्नास वर्षाचा विचार केला तर प्रत्येक धार्मिक स्थळांना जो पैसा, सोने, संपत्ती जमा होत आहे, ती अफाट आहे. मग ती धार्मिकतेच्या नावानी असो की इच्छापूर्तीच्या नावाखाली असो, भीती पोटी असो, चोरीपोटी असो,ही कोट्यावधीची प्रॉपर्टी धार्मिकतेच्या नावाखाली एकत्र जमा होते.ती जमा झालेली प्रॉपर्टी हे आजूबाजूचे अगले बगले, दैववाद सांगणारे,देवालाच लुटतात.असेच लोक वेळ पडली तर चोऱ्याही करतात.म्हणून खूप वेळा धार्मिक स्थळी चोरी झाल्याच्या बातम्या पेपरला छापल्या जातात.
धार्मिक स्थळांना दान कारवे,की नाही,हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भावनेचा भाग आहे.
विवेक काय सांगतो. धर्म का करावा,दान का आणी केंव्हा करावं,
आपला धम्म काय सांगतो, तहानलेल्यांना पाणी द्या.भुकेलेल्यास अन्न द्या. बुडत्याला काठीचा आधार द्या. माणूस,प्राणी,पक्षी, पृथ्वीवरचे सर्व जीव सुखी राहायला पाहिजे.ही पृथ्वी आनंदी राहिली पाहिजे. सुखी राहिली पाहिजे. सृष्टी फुलताना,फळताना दिसली पाहिजे. याच्यासाठी जे जे करता येते ते ते माणसांनी केलं पाहिजे.
आज पृथ्वीवर वरुणाचा प्रकोप होताना दिसतो आहे.जल, जंगल,पाण्या खाली जातं आहे. डोंगर,दऱ्या,कड्या, कपारी कोसळत आहेत.माणसं, गावच्या गावं मातीमोल होताना दिसत आहेत. हा देवाचा प्रकोप नाही तर माणसाने केलेलं नुकसान आहे.आता ते भरून काढणे शक्य नाही.
मग माणसाने काय करावं असा प्रश्न समोर येत असेल तर,विकलांगाशी, दुर्बलांशी, अबलांशी दान करावं.तहानल्यांशी पाणी द्यावं.हेच कार्य सर्वदा करावं,आणि जाता जाता पाणी शुद्ध आणि पवित्र राहील पाहिजे, जंगल जिवंत राहीलं पाहिजे.फळे-झाडे फुलत राहिली पाहिजेत, याच्यासाठी काम करावं.
यातच पुण्य मिळेल. पुण्य म्हणजे तरी काय?आनंद आणि समाधान. ज्यांना रात्री अंग टाकल्यासोबत खुशाल झोप येते तेच खरे पुण्य आहे.
ईश्वर आहे हे जर आपल्या मनात दृढ असेल तर तो पाहायचा असेल तर ज्यांना आपण दान करतो, त्यांचे एकदा स्माईल पहा.त्याच्यात खऱ्या अर्थाने ईश्वराचे प्रतिरूप दिसायला लागेल.
सांगायचा महत्त्वाचा आणि शेवटचा भाग म्हणजे विवेक जागृत ठेऊन समाज हिताचं कार्य करत राहिलं पाहिजे.
शिक्षण ही ज्ञानगंगा म्हटली जाते.तर मग एका बाजूला शाळा पडताना का दिसते?? तर दुसऱ्या बाजूला सोन्याची धार्मिक स्थळे उभरताना का दिसतात. यातील योग्यता तपासणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी योग्य मार्गाने जाण्यासाठी विवेक जागृत ठेवणे हेच महत्त्वाचे ठरेल…..






