शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगड सज्ज; ५ व ६ जून रोजी ऐतिहासिक कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व मावळ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन!
तुळजापूर प्रतिनिधी:- संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर ५ आणि ६ जून रोजी भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. तरी या सोहळ्यात धाराशिव जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवराज्याभिषेक सोहळ्याचे महेश गवळी, जीवन राजे इंगळे, प्राध्यापक सतीश खोपडे ,यांनी पत्रकार परिषद घेऊन केले . या यावेळी पत्रकारांशी बोलताना शिवराज्याभिषेक सोहळ्याचे पदाधिकारी म्हणाले हा सोहळा युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखालीच संपन्न होणार आहे तुळजापूर येथील शिवप्रेमींनी 2017 पासून आई तुळजाभवानीच्या चरणाचे कुंकू देवी जगदंबेच्या कवड्यांची माळ, साडी – चोळीचा मानाचा आहेर देण्याची प्रथा परंपरा चालू केली होती. ती अखंडित ठेवण्याचे काम आम्ही करत आहोत. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातून हजारो शिवप्रेमी जाणार असून जिल्ह्यातील तरुणांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. आयोजन समितीने जाहीर केलेल्या कार्यक्रमपत्रिकेनुसार, ५ जून रोजी दुपारी जिजाऊ आई साहेबांच्या समाधीस्थळी अभिवादन करून सोहळ्याची सुरुवात होईल. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज युवराज शाहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत नागारखान्यापासून गड चढाईला प्रारंभ करण्यात येणार आहे. याच दिवशी युद्धकला प्रात्यक्षिके, ढोलवादन, लेझीम, वारकरी संप्रदायाचा गजर तसेच स्वराज्याच्या इतिहासावर आधारित ‘जागर शिवशौर्यांचा’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी आणि रात्रीच्या सत्रात शिरकाई देवी मंदिरात गोंधळ, तर जगदीश्वर मंदिरात कीर्तन व भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व धाराशिव जिल्ह्यातील छत्रपतींच्या शिवप्रेमी मावळ्यांनी या सोहळ्यासाठी हजर राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.






