मुरूम येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात हभप सोमनाथ महाराज बदाले यांचे निरूपण
*भागवत कथा म्हणजे जीवनातील व्यथा नष्ट करून मृत्यूलाही मंगलमय करणारी कथा*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
श्रीकृष्ण आणि सुदामा भेटीचा प्रसंग पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू
श्रीमद भागवत कथा म्हणजे द्वारकाधिश भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र आहे. श्रीकृष्ण प्रत्यक्ष नारायण तर रुक्मिणी प्रत्यक्ष माता लक्ष्मी आहेत. कलियुगात कथा श्रवण आणि देवाच्या नामजपाच्या आश्रयातुनच मोक्ष मिळणार आहे. भागवत कथा म्हणजे जीवनातील व्यथा नष्ट करणारी तसेच जीवनाचा शेवट गोड करत मृत्यूलाही मंगलमय करणारी कथा असल्याचे प्रतिपादन हभप सोमनाथ महाराज बदाले सोनपेठकर यांनी केले.
मुरूम येथील माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने रत्नमाला मंगल कार्यालयात युवा कीर्तनकार हभप सोमनाथ महाराज सोनपेठकर यांच्या अमृतवाणीने संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या संगीतमय कथेत तबलावादक चंद्रकांत गायकवाड, पॅडवादक ओमकारा परळीकर, सिंतवादक भगवंत सोळंके, गायक कृष्णा महाराज हाके यांची त्यांना साथ मिळाली. शुक्रवारी पार पडलेल्या कथेच्या सांगता सोहळ्यात “प्रेम सुख देई,प्रेम सुख देई,,प्रेमविन नाही समाधान” या ओवी वर निरूपण करताना ते बोलत होते. दि 6 जून ते दि 12 जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहात माहेश्वरी समाजाच्या युवकांनी कथेतील प्रसंगानुरूप कपिल अवतार, श्री नरसिंह अवतार, श्री कृष्ण जन्मोत्सव झांकी सादर करून उपस्थित भाविकांचे लक्ष वेधले. गुरुवारी श्रीकृष्ण व रुक्मिणी स्वयंवर पार पडले. स्वयंवर सोहळ्याचा हा प्रसंग डोळ्यात साठवण्यासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी सकाळी या कथेची सांगता झाली. यावेळी कथाकार बदाले महाराज यांनी आपल्या अमृतवाणीने भगवान श्रीकृष्ण यांच्या 16 हजार 108 विवाहांची कथा व सुदामा चरित्र सांगत श्रीकृष्ण भेटीच्या प्रसंगाचे वर्णन करत परीक्षित मोक्षाची कथा सांगून भाविकांना मंत्रमुग्ध केले. तसेच आई, वडील, साधुसंतांची सेवा करत नित्यनेमाने राम कृष्ण हरी चा जप करण्याचे आवाहन केले. सांगता सोहळ्यानंतर माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वतीने भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. कथा सोहळ्यासाठी माहेश्वरी प्रगती मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
*श्रीकृष्ण आणि सुदामा भेटीच्या प्रसंगाने वातावरण भावुक*
शुक्रवारी श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता झाली. याप्रसंगी कथेतील श्रीकृष्ण आणि सुदामा भेटीचा जिवंत सजीव देखावा सादर करण्यात आले. यावेळी श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा श्रीकृष्णाच्या भेटीला गेल्यानंतर त्याला प्रवेशद्वारावर द्वारपाल अडवतात तेंव्हा सुदामा “अरे द्वार पालो,,कंनैय्या से कह दो,,की दर पे सुदामा गरीब आ गया है” म्हणत द्वारपालाकडे केविलवाणी विनवणी करत असतात आणि सुदामा आल्याची वार्ता कळताच श्रीकृष्ण धावत येऊन बालपणीचा सवंगडी सुदामाची गळा भेट घेतात आणि त्याला आपल्या गादीवर विराजमान करतात हा हुबेहूब साकारण्यात आलेला प्रसंग पाहताना कथावाचक बदाले महाराज यांच्यासह उपस्थित महिला भाविकांसह अनेकजण भावुक झाले होते. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची भूमिका कल्पेश व पूजा मिनियार या उभयंतांनी केली तर कृष्णा शर्मा यांनी सुदामाची भूमिका उत्तमपणे पार पाडली.








