उमरगा शहर प्रतिनिधी : शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि विविध मागण्यांचे धाराशिव जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी, (दि १६) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यात पीक विमा, कर्जमाफी, पेरणीसाठी आर्थिक मदत आणि संभाव्य दुष्काळाबाबत नियोजन करण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
तहसीलदार गोविंद येरमे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करीत आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पदरात अपेक्षित उत्पादन पडले नाही. शासनाने जाहीर केलेला पीक विमा अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे २०२५ चा पीक विमा विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी करण्यात आली. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असून प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी, तसेच हवामान विभागाने कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने संभाव्य दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी शासनाने तातडीने नियोजन करावे, असे निवेदनात नमूद करून राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्यात तसेच प्रोत्साहनपर अनुदान रक्कम वाढवावी, अन्यथा शेतकर्यांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याची निवेदनात भीती व्यक्त करीत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी निवेदनात शेवटी केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष रेखा पवार, रेखा साळवे, उषा पवार, सुवर्णा पवार, चमाबाई हराळे, मंगल सोनकांबळे, शितल गायकवाड, विशाल माने, दिनेश पाटील, माधव जाधव, पवन चव्हाण, भानुदास दुधभाते आदींच्या सह्या आहेत.





