वागदरीत गुढीपाडवा पट वाढवा प्रवेश दिंडी : विद्यार्थानी उभारलेल्या प्रवेश गुढीचे केले घरोघरी पूजन
—————————————————–
नळदुर्ग( एस.के. गायकवाड ):
वागदरी तालुका तुळजापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने गुढी पाडव्याच्या निमित्ताने गुढी पाडवा जिल्हा परिषद शाळेतील प्रवेश वाढवा हा उपक्रम राबविण्यात आला असून या निमित्ताने विद्यार्थ्यांनी उभारलेल्या प्रवेश गुढीसह गावातील मुख्य रस्त्यावरून टाळ मृदंगाच्या गजरात हलगीच्या निनादात लेझीम पथकासह प्रवेश दिंडी काढण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उभारलेल्या गुढीचे पालकांनी घरोघरी पूजन करून या प्रवेश दिंडीचे स्वागत केले.
सध्या पालकांत इंग्लिश मीडियम स्कूलचे आकर्षण वाढले असून त्यामुळे गावोगावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळाची विद्यार्थी पट.संख्या झपाट्याने घटत असल्याचे दिसून येत आहे. ही एक चिंतेची बाब असून या विषयी जाणीव जागृती करण्याच्या उद्देशाने गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुढी पाडवा पट वाढवा हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक बी.बी. सगर यांच्या मार्गदर्शकाखाली वागदरी येथे राबविण्यात आला.
. येथील जि.प.प्राथमिक शाळा वागदरी येथे गुढीपाडवा प्रवेश वाढवा उपक्रम घेण्यात आला.यामध्ये इयत्ता पहिलीत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम घेण्यात आले.
. प्रथमतः गावच्या सरपंच सौ.तेजाबाई मिटकर,माजी उपसरपंच दत्ता सुरवसे,भाजपा तालुका उपाध्यक्ष किशोर सुरवसे, सेवा निवृत्त शिक्षक शिवाजी मिटकर गुरुजी,शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा कोमल झेंडारे, सीआरपी विद्या बिराजदार , जिप्सी गाडी मालक जितेंद्र पाटील, दत्ताभाऊ पाटील, सर्व शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामस्थ ,पालक ,यांच्या उपस्थितीत सावित्री माईच्या फोटोचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
तदनंतर इ.पहिलीत नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांना साखरेचा हार ,फुलांचा हार, टोपी घालून त्यांचे औक्षण करण्यात आले.
नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जिप्सी गाडी सजवून त्यामध्ये सर्व मुलांना बसवून वाजत गाजत ढोल ,ताशा, हलगी ,म्युझिक तसेच लेझीम पथक ,भजनी मंडळ टाळाच्या गजरात संपूर्ण गावात प्रवेश दिंडी काढण्यात आली.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी उभारलेल्या प्रवेश वाढवा गुढीचे ग्रामस्थांनी चौका चौकात पूजन केले.नवीन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या दारी जाऊन त्यांच्या पावलाचे ठसे घेऊन पूजा करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद शाळेचे महत्व सर्व ग्रामस्थांना पटवून देण्यात आले.आणि आजच आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करा असे सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले.यावेळी विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते.







