तुळजाभवानी रेल्वे संघर्षाला मोठा सन्मान! महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आली तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती
तुळजापूर/पुणे : प्रतिनिधी
सोलापूर–तुळजापूर–धाराशिव–उस्मानाबाद हा महत्वाकांक्षी रेल्वेमार्ग व्हावा, या मागणीसाठी तब्बल १५ ते २० वर्षे अहोरात्र पाठपुरावा व विविध आंदोलनांच्या माध्यमातून लढा देणाऱ्या तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीला मोठा सन्मान मिळाला आहे. समितीच्या दशकांतील संघर्षाची दखल घेऊन आनंदी युनिव्हर्सल फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला.
पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहामध्ये दि. १० डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनराव गावडे आणि तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समितीला सुपूर्द करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुरस्कार सुप्रसिद्ध सिने अभिनेते प्रसाद शिखरे आणि अभिनेत्री आयलीघीया यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
२००६ पासून रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या या संघर्षात हजारो भाविक, नागरिक आणि लोकप्रतिनिधींना जागविण्यासाठी संघर्ष समितीने धरणे, मोर्चे, निवेदन, जनजागृती मोहीम अशा विविध माध्यमांचा वापर केला. संघर्षाची तीव्रता वाढवत रेल्वेची गरज अधोरेखित करण्याचे कार्य सातत्याने करण्यात आले.
या अभूतपूर्व सन्मानानिमित्त समितीचे उपाध्यक्ष विकास तांबे, रत्नाकर खोले, अशोकराव साळुंखे, राऊफ शेख, अंबादासराव पोपळे, अनिल हंगरगेकर, मोहन भोसले, सतीश पवार, राहुल गवळी, खयूम शेख, अनमोल साळुंखे, चंद्रकांत मस्के, बापू वैरागे, गोविंद विजय, बापू कदम, कांबळे, दिवटे, दयानंद पांचाळ, कोंडीबा प्रताप, लायक सय्यद यांच्यासह आंदोलनात वर्षानुवर्षे सक्रिय योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचा लवकरच तुळजापूर नगरीत भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली आहे.
तुळजाभवानी रेल्वेमार्गासाठीचा हा गौरव समितीच्या दशकभराच्या अत्यंत लोकाभिमुख लढ्याचे प्रतिनिधित्व करतो, अशी भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे.







