डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त माजी मंत्री बसवराज पाटील यांच्याकडून उमरग्यात अभिवादन*
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचा उत्सव जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याच मंगलमय प्रसंगी, महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामीण विकास राज्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी आज उमरगा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.
बसवराज पाटील यांनी उमरगा येथील नगरपरिषद कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पाटील यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी समाजाला दिलेल्या समतेच्या आणि क्रांतीच्या विचारांची आजच्या काळात किती आवश्यकता आहे, यावर त्यांनी भाष्य केले.
या अभिवादन सोहळ्याप्रसंगी दिलीप भालेराव, कैलास शिंदे, विक्रम मस्के, विजय दळगडे, हरीश डावरे आणि गोविंद सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्राध्यापक सौ. सरपे, सौ. संगीता पाटील, सौ. भालेराव, प्राध्यापक शौकत पटेल, सतीश सुरवसे आणि महेश माशाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी यावेळी महामानवाच्या स्मृतीस उजाळा देत ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.







