अ, ब, क, ड उपवर्गीकरणासाठी २० ऑगस्टला धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा!
तुळजापूर प्रतिनिधी;- भूम येथील सकल मातंग समाजाच्या बैठकीत मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.
धाराशिव / भूम (प्रतिनिधी): मातंग समाजाच्या प्रदीर्घ प्रलंबित ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्हा सकल मातंग समाज उपवर्गीकरण कमिटी आक्रमक झाली आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी येत्या २० ऑगस्ट २०२६ रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आज, ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भूम येथे सकल मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक समन्वय समितीचे प्रमुख पदाधिकारी श्री. युवराज शिंदे, श्री. किशोर साठे आणि श्री. ईश्वर क्षीरसागर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.
या बैठकीमध्ये उपवर्गीकरणाच्या लढ्याला तीव्र स्वरूप देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजाला हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी २० ऑगस्ट रोजी निघणारा मोर्चा ऐतिहासिक ठरला पाहिजे, यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मातंग बंधू-भगिनींनी हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये उपस्थित राहावे, असे जोरदार आवाहन यावेळी सर्व मार्गदर्शक व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले.
या बैठकीस भूमचे उपनगराध्यक्ष श्री. प्रदीप साठे, श्री. रोहन खलसे, श्री. प्रल्हाद साठे, श्री. गणेश साठे, श्री. विनोद साठे, श्री. अशोक कसबे, श्री. कांत साठे, श्री. दत्ता साठे यांच्यासह सकल मातंग समाजाचे इतर पदाधिकारी व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.







