वीरपत्नी लक्ष्मीबाई गायकवाड यांचा भावपूर्ण सत्कार; १९८७ च्या श्रीलंकेतील युद्धात कै. रामा गायकवाड यांना आले होते वीरमरण!
तुळजापूर (प्रतिनिधी):-
“देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र खडतर परिस्थितीत पहारा देतात, म्हणूनच आपण सर्व नागरिक आज घरात सुखाने आणि सुरक्षित जगू शकतो,” या कृतज्ञतेच्या भावनेतून गुळहाळी येथील वीरशहीद कै. रामा गायकवाड यांच्या वीरपत्नी लक्ष्मीबाई रामा गायकवाड यांचा नळदुर्ग येथे अत्यंत भावुक वातावरणात सत्कार करण्यात आला. माजी पोलीस अधिकारी महादेव हांडे यांच्या धर्मपत्नी श्रीमंताबाई महादेव हांडे यांच्या हस्ते लक्ष्मीबाई गायकवाड यांना साडी-चोळी, शाल, हार व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
१९८७ च्या श्रीलंका युद्धादरम्यान बॅटल फायरिंगमध्ये देशासाठी प्राण पणाला लावून वीरमरण आलेले गुळहाळीचे सुपुत्र कै. रामा गायकवाड यांच्या अलौकिक शौर्याला आणि त्यागाला या सोहळ्यात उजाळा देण्यात आला. सैनिक सीमेवर लढतो, पण त्याच्या पाठीमागे संपूर्ण कुटुंब तितक्याच धैर्याने त्याग करत असते. त्यामुळे वीरपत्नीचा सन्मान करणे हे केवळ एका व्यक्तीचे कौतुक नसून संपूर्ण सैनिकी कुटुंबाच्या त्यागाला दिलेली मानाची वंदना आहे, असे उद्गार यावेळी उपस्थितांनी काढले.
या सोहळ्यास नळदुर्गचे वाहतूक नियंत्रक अनिल हांडे, आबाजी जाधव, शिवाजी माने, विश्वनाथ हत्ते, भरत जाधव पुजारी, मधुकर लोखंडे, प्रकाश मुळे, महेश डुकरे, ओंकार हांडे, इरफान काझी, मोहित कलकोटे, लक्ष्मी फरताळे, राजनंदनी हांडे यांच्यासह माजी सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार प्रसंगी उपस्थितांचे डोळे पाणावले तर उराशी अभिमानाची भावना दाटून आली होती.







