धाराशिव जिल्हा परिषदेचा क्रांतिकारी निर्णय: ३५०० महिला बनणार उद्योगजक; ‘लखपती दीदी’नंतर आता ‘करोडपती दीदी’ अभियानावर भर!
तुळजापूर प्रतिनिधी :-
जिल्ह्याची ‘आकांक्षांकित जिल्हा’ ही ओळख पुसून टाकण्यासाठी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेने एक अभिनव व क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (MSRLM) जिल्ह्यातील प्रत्येक गावात ४ ते ५ महिला उद्योजक घडवून तब्बल ३,५०० नवीन महिला उद्योजक तयार करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प करण्यात आला आहे. अशा प्रकारची नावीन्यपूर्ण प्रोत्साहन भत्ता योजना राबवणारी धाराशिव जिल्हा परिषद ही राज्यातील पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे.
बातम्यातील महत्त्वाचे मुद्दे:
३,५०० महिलांना उद्योजक बनवण्याचे उद्दिष्ट: जिल्ह्यातील ७३४ गावांमध्ये प्रत्येकी ४ ते ५ महिलांना ‘मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम’ (CMEGP) आणि ‘प्रधानमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम’ (PMEGP) द्वारे कर्ज उपलब्ध करून देऊन उद्योजक बनवले जाईल.
समुदाय संसाधन व्यक्तींना (CRPs) प्रोत्साहन भत्ता: बँक कर्ज प्रकरण मंजूर करून देणाऱ्या ‘उमेद’ अभियानातील सर्व समुदाय संसाधन व्यक्तींना (CRPs) प्रत्येक कर्ज प्रकरणासाठी जिल्हा परिषदेतर्फे ₹ १,०००/- प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे.
’लखपती दीदी’ ते ‘करोडपती दीदी’: जिल्ह्यात सध्या १,१९,००० लखपती दीदी तयार झाल्या असून, आता पुढील टप्प्यात ‘करोडपती दीदी’ तयार करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
CMEGP योजनेत जिल्हा राज्यात प्रथम: सन २०२५-२६ मध्ये CMEGP अंतर्गत ७०० पेक्षा जास्त उद्योगांना कर्ज वितरण झाले असून, धाराशिव जिल्हा मागील सलग ३ वर्षे राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे.
जिल्ह्यातील ‘उमेद’ अभियानाची स्थिती:
स्थापन स्वयंसहाय्यता गट: १५,३८४
सहभागी सदस्य व कुटुंबे: १,४६,११९
ग्रामसंघ व प्रभागसंघ: ७७८ ग्रामसंघ आणि ५५ प्रभागसंघ
उत्पादक गट व कंपन्या: ५१४ उत्पादक गट आणि ९ महिला शेतकरी उत्पादक कंपन्या
कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती: सुमारे १,२००
या नावीन्यपूर्ण योजनेमुळे काम करणाऱ्या समुदाय संसाधन व्यक्तींचे मनोबल वाढणार असून, जिल्ह्यातील महिलांचा आर्थिक व सामाजिक स्तर अधिक उंचावण्यास मोठी मदत होणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी आज रोजी पत्रकार परिषदेत दिली.







