शेतकऱ्यांना आमिष, मजुराचा मृत्यू शेतीमालक कायद्याच्या कचाट्यात – रिन्यु पॉवरविरोधात संताप
मोबदला नाही, सुरक्षा नाही; रिन्यु पॉवरमुळे शेतकरी-मजुरांचे प्राण स्वस्त…
धाराशिव : प्रतिनिधी
पवनऊर्जा प्रकल्पांमुळे नेमका कोणाचा विकास होतोय, असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पवनचक्की कंपन्यांच्या कथित मनमानी कारभारामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे आणि मजुरांचे जीव धोक्यात येत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे.तुळजापूर तालुक्यातील देवसिंग परिसरात घडलेल्या रिन्यू कंपनीच्या विद्युतपोल वरच्याविजेच्या तारांशी संबंधित अपघातात एका मजुराचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर पवनचक्की कंपन्यांच्या जबाबदारीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणात प्रथमदर्शनी मजुरास पोलवर चढविणाऱ्या शेतकऱ्याची जबाबदारी असल्याचे चित्र समोर येत असले, तरी प्रत्यक्षात पवनचक्की प्रकल्प राबविणारी ‘रिन्यु पॉवर’ कंपनीच या घटनेस कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रिन्यु कंपनीकडून शेतकऱ्यांच्या शेतातून वीज पोल व तारा टाकण्यासाठी आर्थिक मोबदल्याचे आमिष दाखवून काम करून घेतले जाते. मात्र, काम पुर्ण झाले नंतर ठरलेला मोबदला वेळेवर न दिल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडे काम थांबविण्याचा किंवा कायदेशीर मार्गाने न्याय मागण्याचा कोणताही प्रभावी पर्याय राहत नाही त्यामुळे शेतकरी अश्या असुरक्षीत मार्गाचा अवलंब करतात व परीणामी अश्या दुर्घटना होतात व दुर्घटनेनंतर शेतकरी किंवा शेतीमालकच कायद्याच्या कचाट्यात अडकतात व संपुर्ण घटणेच मुलत: जबाबदार रिन्यु पावर सारख्या कंपन्या मात्र मोकाट सुटतात असे विदारक चित्र जिल्हाभर पहावयास मिळत असुन अशा परिस्थितीत कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व केवळ शेतकर्यांचे पैसे थकवील्यामुळेच असे प्रकार घडत आहेत हे वास्तव नाकारता येणार नाही.
या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा प्रशासनाने पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी कारभाराला तातडीने लगाम घालावा, तसेच शेतकऱ्यांना होणारी नुकसानभरपाई व मोबदला वेळेवर देण्यासाठी कंपन्यांना बांधील करावे, अशी जोरदार मागणी होत आहे. वेळेवर मोबदला मिळाल्यास असे प्रकार घडणार नाहीत हे मात्र नक्की असुन यावर जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे…






