वारसा नोंदीसाठी तुळजापूर रूरलमध्ये विशेष शिबिर
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने तुळजापूर रूरल येथे वारसा नोंदीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी धाराशिव व तहसीलदार तुळजापूर यांच्या आदेशानुसार हे शिबिर राबविण्यात येत असून, मयत शेतकरी/खातेदारांच्या वारसांचे फेरफार वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.तुळजापूर रूरलमधील ज्या शेतकरी किंवा खातेदारांचे निधन झाले आहे, त्यांच्या वारसांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) शरद दुधभाते यांनी केले आहे. मयताच्या वारसांपैकी कोणत्याही एका व्यक्तीने विहित नमुन्यातील अर्जासह मृत्यू दाखला, वारसा दाखला, शपथपत्र, आधार कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे घेऊन सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ग्राम महसूल अधिकारी कार्यालय, तुळजापूर रूरल येथे उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.या शिबिरामुळे शेतकऱ्यांच्या वारसा नोंदी सुलभ होऊन महसूल खात्यातील प्रलंबित फेरफार वेगाने निकाली निघणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






