जिल्हा परिषद निवडणूक २०२६ : तुळजापूर तालुक्यात रणधुमाळीला सुरुवात
तुळजापूर | प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणूक २०२६ चा बिगुल वाजला असून तुळजापूर तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ ते २१ जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. त्यानंतर २७ जानेवारी रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून ५ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे.
तुळजापूर तालुक्यात ही निवडणूक आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली निर्णायक वळण घेणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षांत विकासकामांचा ठसा उमटवणाऱ्या आमदार पाटील यांनी ग्रामविकास, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत मुद्द्यांवर ठोस भूमिका घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण मतदारांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबाबत विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.
या निवडणुकीत गट-तट विसरून विकास हा केंद्रबिंदू मानून रणनिती आखली जात असल्याचे जाणकारांचे मत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून थेट गावागावातील प्रश्न मार्गी लावण्याची क्षमता असते. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात सक्षम, काम करणारे आणि लोकांच्या प्रश्नांशी थेट जोडलेले उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे. आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बूथनिहाय तयारी सुरू केली असून संपर्क मोहीम वेग घेत आहे.
दुसरीकडे विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार सुरू असला तरी, सत्तेवर टीका करण्यापलीकडे ठोस कार्यक्रम नसल्याचा आरोप सत्ताधारी गटाकडून केला जात आहे. “फक्त घोषणाबाजी नव्हे तर प्रत्यक्ष काम हाच आमचा अजेंडा” असे ठाम मत कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
एकूणच जिल्हा परिषद निवडणूक २०२६ ही केवळ सत्ताबदलाची नव्हे, तर ग्रामीण भागाच्या भवितव्याची चाचणी ठरणार आहे. मतदारांनी जागरूक भूमिका घेत विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही यानिमित्ताने पुढे येत आहे. तुळजापूर तालुक्यातील ही लढत आगामी राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारी ठरेल, यात शंका नाही.






