एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत तुरोरी येथे खरीप हंगाम मोहिमेचे उत्साहात आयोजन; ‘बीबीएफ’ पेरणीचे थेट प्रात्यक्षिक!
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
तालुका कृषी अधिकारी उमरगा यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि.३०) जून रोजी तुरोरी येथे ‘एक दिवस बळीराजासाठी’ या विशेष उपक्रमांतर्गत खरीप हंगाम मोहिमेचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला परिसरातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत विविध आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.
खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेत कृषी अधिकाऱ्यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी प्रदीप भोसले यांनी बीजप्रक्रिया, पिकांचे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या दुष्काळी किंवा विषम परिस्थितीचा सामना कसा करावा, याविषयी महत्त्वपूर्ण उपाययोजना सांगितल्या. उपकृषी अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी रुंद वरंबा-सरी पेरणी पद्धतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. केवळ तोंडी मार्गदर्शन न करता, प्रशिक्षित चालक भीमाशंकर माने यांनी प्रत्यक्ष बीबीएफ यंत्राद्वारे पेरणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या थेट प्रात्यक्षिकामुळे आधुनिक पेरणी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी कशी करावी, हे समजणे शेतकऱ्यांना सोपे झाले.
यामध्ये प्रामुख्याने पंचायत समिती सदस्य तुकाराम जाधव, माजी उपसरपंच पवन जाधव, पोलीस पाटील प्रशांत जाधव, प्रगतशील शेतकरी उमेश जाधव, व्यंकट जाधव, बालाजी जाधव, पांडुरंग जाधव, दीपक तपसाळे, मुरलीधर जाधव, तुकाराम गायकवाड, संजय पाटील, किसन कराळे, गोविंद पाटील, दीपक पाटील आणि नंदकिशोर पाटील आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी सचिन पुरी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी दिगंबर जाधव, रवी पाटील, शरद आरिकर, दिपाली चौधरी आणि उत्कर्षा गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
या मोहिमेमुळे तुरोरी व परिसरातील शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी योग्य दिशा मिळाली असून, यंदा आधुनिक पद्धतीनेच शेती करण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






