तीर्थक्षेत्र तुळजापूरचामान उंचावणारी ऋतुजा जगतापची एमपीएससी मधील उल्लेखनीय कामगिरी !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तीर्थक्षेत्र तुळजापूरचामान आणखी एकदा उंचावणारी आनंदवार्ता समोर आली असून सध्या परिसरात तिची जोरदार चर्चा रंगत आहे.धाराशिव जिल्ह्यातील होतकरू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलेली ही यशोगाथा म्हणजे कु. ऋतुजा नागनाथ जगताप हिची. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत चमकदार यश मिळवत तिने तांत्रिक सहाय्यक अधिकारी (वर्ग-३) पदासाठी पात्रता संपादन केली असून तुळजापूर शहरासह तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे.
तुळजाभवानीच्या पायथ्याशी वाढलेल्या ऋतुजाने प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले. कष्ट, जिद्द व चिकाटी यांच्या बळावर साधलेल्या या उत्तुंग कामगिरीमुळे तुळजापूरच्या तरुणाईत नवचैतन्य निर्माण झाले आहे. तिच्या यशाने जगताप कुटुंबासह तुळजापूरवासीयांचा अभिमान दुणावला आहे.
ऋतुजाच्या यशाचा आनंद साजरा करताना जगताप कुटुंबाचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्योजक रामभाऊ दशरथ चोपदार, शाम नेताजीराव चोपदार, राजेश चोपदार, वैभव चोपदार, ओंकार काळे, बालाजी तट नगरसेवक माऊली भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कारावेळी बोलताना मान्यवरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाचे कौतुक केले. “स्वप्न मोठे ठेवा आणि प्रयत्न सातत्याने करा, यश नक्की मिळते,” असा संदेश त्यांनी तरुणाईला दिला.
कुटुंबीयांनीही भावूक होत ऋतुजाच्या अभ्यास प्रवासाची मागणी घेऊन तिच्या मेहनतीचे कौतुक केले. योग्य मार्गदर्शन, कुटुंबाचा पाठिंबा आणि अभ्यासासाठी तयार केलेले वातावरण यामुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात समाजाभिमुख दृष्टीकोन ठेवून प्रामाणिकपणे व जबाबदारीने सेवा बजावण्याचा निर्धार ऋतुजाने व्यक्त केला.
एमपीएससीमधील वाढती स्पर्धा आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी असलेली आव्हानात्मक परिस्थिती पाहता ऋतुजाचे यश विशेष ठरत आहे. तिच्या यशाने तुळजापूर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा लाभली असून पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव सतत सुरू आहे.






