Best News Portal Development Company In India

पालक-शिक्षकांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधा : मान्यवरांचे प्रतिपादन!

पालक-शिक्षकांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधा : मान्यवरांचे प्रतिपादन!

पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, केसरजवळगा येथे पालक मेळावा उत्साहात; गुणवंत विद्यार्थी व नवागत शिक्षकांचा सत्कार

उमरगा/लोहारा प्रतिनिधीआदिनाथ भालेराव.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्यातील संस्कार, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी पालक व शिक्षक यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. घर आणि शाळा यांनी एकत्रितपणे कार्य केल्यासच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडू शकते, असे प्रतिपादन मान्यवरांनी पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, केसरजवळगा येथे आयोजित पालक मेळाव्यात केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष अजीज शेख, माजी सरपंच अमोल पटवारी, उपसरपंच जयंपालसिंग राजपूत, विजय गायकवाड, शेखर चिंचोरे, बालाजी डिगोळे, डॉ. जीरोळे, राजू परीट (मामा), शमशोद्दीन इनामदार, रमा सुरवसे, लक्ष्मी राजपूत, इंद्रजित लोखंडे, गुंडा महाराज तसेच इसुनाथ घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ए.टी.एस. परीक्षेत यश मिळविलेल्या शशांक शरणप्पा चिंचोरे, शशिकला शरणप्पा चिंचोरे आणि वेदांत प्रशांत चिंचोरे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेले प्रथम हणमंत जीरोळे व स्वराली विजयसिंह राजपूत, तसेच इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या सानवी इंद्रजित लोखंडे (१९८ गुण), सायली महेश कांबळे (१९२ गुण), श्रीकांत अमृत हल्ले (१७६ गुण), दीपिका ख्यामलिंग घोडके (१७४ गुण), रिया नागेश सोनकांबळे (१४८ गुण) आणि निरंजन राजेंद्र तोरणगे (१३० गुण) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.

याच कार्यक्रमात शाळेत नव्याने बदलीने रुजू झालेल्या श्रीम. सुनीता शंकर चव्हाण, श्री. विनोद तुळशीराम सूर्यवंशी, श्री. राजेश सुरेश सूर्यवंशी, श्री. प्रदीप बिभिषण सागरे, श्री. बालाजी रामसिंग चव्हाण, कु. पूजा मनोज जाधव आणि कु. निकिता कल्याणी रायभोगे या शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. नव्या शिक्षकांमुळे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत शिक्षकांशी संवाद साधला. शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामागील पालकांच्या योगदानाचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे आकर्षक चित्रांकन चित्रकार अर्जुन दत्तात्रय पांढरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुनिल राठोड यांनी केले, तर बालाजी भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक संजीव भोसले, सुनिल राठोड, सहदेव बोडरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मान्यवरांची उपस्थिती आणि गुणवंत विद्यार्थी व नवागत शिक्षकांच्या सत्कारामुळे कार्यक्रम प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india